Monday, 11 July 2022

जावईपूरम्..भाग २

 वैभव डोक्याला हात लाऊन बसला होता.  कालपासून त्याची फारच चिडचिड होत होती . तो सर्वच बाबतीत  सरस असूनही केवळ मुलगा असल्यामुळे त्याच्या हातून मल्टिनॅशनल  कंपनी चा जॉब निसटला होता. 


मुलींची वाढती  संख्या,  सरकारने त्यांना दिलेली मुभा , सरकारच्या बदललेल्या पॉलिसी ह्यामुळे त्याच्यासारखे अनेक तरुण हताश झाले होते.  


आजपासून साधारण पणे ५०० वर्षापुर्वी मुलींची संख्या जवळपास नगण्य झाली होती म्हणे. तेंव्हा सरकारने एक नवीन योजना राबविली  होती .   


ज्या घरात मुलगी जन्माला येईल त्या व्यक्तीला एक मोठे घर , मुलीच्या शिक्षणाचा खर्च , मुलीच्या नोकरीची हमी , मुलीच्या लग्नाचा खर्च सर्व काही सरकारी खर्चाने होईल.


मात्र लिंग परीक्षांवर निर्बंध तसेच ठेवले होते . त्यामुळे मुलांच्या संख्येत घट झाली नाही हे नशिब.


ज्या लोकांना सरकारचा हा निर्णय मानवला नव्हता  त्यांना सरकारने परदेशात वा परग्रहावर जाण्यासाठी सहजतेने व्हिसा मिळण्याची सोयही करून ठेवली होती. 


सरकारच्या ह्या पॉलिसी मुळे जावईपूरम् ची निर्मिती झाली होती . 


जावईपूरम् चे सरळ सरळ दोन भाग होते.  एक भाग  मुली , त्यांचे आई वडील  आणि मुलींचे नवरे ह्यांच्या साठी आरक्षित होता . 


तर दुसर्‍या भागात आई वडील आणि त्यांचे मुलगे ह्यांच्यासाठी छोटेखानी घरे होती . 


दोन्ही भागांच्या मधे चांगली २५ फुट उंचीची अत्यंत गुळगुळीत भिंत उभी होती. कोणीही कितीही ठरविले तरी एका भागातून दुसर्‍या भागात भिंतीवरून चढून जाणे केवळ अशक्यच होते.


जावईपूरम् मधल्या कोण्या नवविवाहित जोडप्याला मुलगा झाला तर जावईपूरम् मधून त्यांची हकालपट्टी केल्या जात असे . 


ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून करून वैभव थकला होता . आईला आणि श्री ला सोडून जायच्या विचाराने तो अस्वस्थ होत होता. 


एकदा गेले की नियमांनुसार दोन वर्ष  तो फोन वरून ही संपर्क साधू शकणार नव्हता . परंतु त्याच्या ख्यालीखुशाली ची सगळी माहीती संगणकीय आंतरजाल प्रणाली ने त्याच्या आई पर्यंत पोहोचवली जाणार होती .


एखाद दीड वर्षात श्री सुद्धा २१ वर्षे पूर्ण करणार होता . पुन्हा त्याची भेट केंव्हा होईल देवचे जाणे.


ते पत्र आणि यादी मिळाल्यापासून आई अगदी कामात गुंतून गेली होती.  प्रत्येक मुलीची  प्रोफाईल  अगदी बारकाईने अभ्यासत होती. खूप वेळ त्या यादी चा  अभ्यास झाल्यावर तिने फक्त ५ मुलीच  निवडल्या. त्याबद्दल जावईपूरम् मधील कार्यालयात कळवून ही टाकले होते .


मला  त्या मुलींच्या बद्दल एक एक गोष्ट कमी कमी १० वेळा तरी सांगितली . त्यांचे गुण-अवगुण , निवड करताना कोणते निकष लावायचे ह्याची उजळणी तर किती वेळाच करून झाली होती.


ह्याशिवाय आपले संस्कार, संस्कृती, कष्टाळू पणा ह्या सगळ्या बद्दल  पुन्हा पुन्हा उठता बसता मी ऐकतच होतो .


ह्या ५ मुलींपैकी ज्या माझ्या सर्व परफॉर्मन्स वर जास्ती चांगले मार्क्स देतील तिच्याशी माझे लग्न लावून देण्यात येणार होते. त्यावेळी माझी पसंती लक्षात घेण्यात येणार नव्हती. 


निमुटपणे लग्नाला उभे राहावे लागणार होते . पडेल ते काम करावे लागणार होते. बायकोच्या तालावर नाचावे लागणार होते .


आईने बॅग भरून ठेवली. काय काय भरले याची यादी ही बॅगवर चिटकवून ठेवली. नवनवीन पदार्थांच्या रेसिपी चे एक मोठ्ठे रजिस्टर तिने बनवून दिले होते .


मी मात्र ह्या तयारी कडे अत्यंत थंड आणि त्रयस्थपणे पहात होतो. समोर येणार्‍या परिस्थितीला कसे सामोरे जायचे ह्या विचारानेच माझ्या मनात प्रचंड उलथापालथ होत होती . 


पैसे रग्गड असते तर कदाचित मी परग्रहावर पळून गेलो असतो. पण आता माझ्यासमोर कोणताही पर्याय उरला नव्हता. 


फोनच्या आवाजाने मी भानावर आलो . फोन जावईपूरम्  मधूनच होता.  उद्या सकाळीच मला तिथे हजर होण्यास सांगितले होते. मी धक्का बसून भिंतीवरच्या कॅलेंडर कडे पाहिले . आणि लक्षात आले अरे हो उद्याच निघायचे आहे ... हे ८ दिवस कसे भराभर गेले कळलेच नव्हते . ..


उद्याच्या सकाळ नंतर माझ्या भाग्याची वाट मला कुठे घेऊन जाणार होती हे मलाच ठावूक नव्हते....


                                             ..  क्रमशः 



©️®️सौ. मंजूषा श्रीकांत अपराजित 

❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️


माझ्या खूप छान वाचक मित्र मैत्रिणींनो कसा वाटतोय वैभव चा प्रवास ? उद्यापासून बिचारा संकटात पडतोय की सुखात लोळणार हे येणारा दिवसच ठरवणार  आहे.


थोडेसे तुमच्या शी हितगुज करायचे आहे. ही कथा काल्पनिक आहे. कल्पना विलास  जरा जास्तच हास्यास्पद आहे . पण स्त्री भ्रूण हत्या वेळीच थांबवली नाही तर भविष्यात हेही घडू शकेल नाही का ? 


सरकारने स्त्री भ्रूण हत्या कायदेशीर गुन्हा ठरवली असला तरी चोरी छुपे हे घडतेच आहे. सरकार कुठे कुठे पुरणार ? आपल्या खांद्यावर प्रत्येकानेच जबाबदारी उचलायची आहे. विचार करा ..


No comments:

Post a Comment

Welcome

संस्कारित नारायणी : सौ. ललिताशास्त्री विनायकशास्त्री आर्वीकर

 ती माणसच निराळी असतात , पूर असतो त्यांच्या स्वभावात,  किनारा सोडतात तेंव्हा नदीहून बेफाम होतात , कोसळतात खोल तेंव्हा किती उंच जातात . हृदय ...