Saturday, 30 April 2022

स्त्री जन्मा ही तुझी कहाणी..बदलत्या संकल्पना आणि छेद देणार्‍या रूढी

 झुंजूमुन्जु व्हायला लागले होते. पक्षांचा किलबिलाट खूप सुखद  अनुभव देत होता. सोबतीला थंडगार मोकळा वारा . निसर्गाची ही मुक्त भरभरून देणगी आपण शहरवासियांनी कधीच नाकारली आहे . हजारो लाखो रुपये खर्च करून कुलर आणि एसी त राहून स्वतः चे स्वास्थ्य गमावण्यातच आपण धन्यता मानतो. दूरवरून मंदिरातून  येणारे  काकड आरती चे स्वर प्रसन्नतेत भर घालत होती. 


आतून चुलीवर खळखळणार्‍या चहाचा दरवळ सगळ्यानाच जागा करून गेला.  त्यातच सुभा दादा  ने मारलेली आरोळीने "चाय झाला ताई लोग , दादा लोग , या बीगी बीगी..."  सगळ्यानाच  उठायला भाग पाडले.


कालच्या गप्पांची विचारचक्र अजूनही सगळ्यांच्याच डोक्यात चालू होते . प्रत्येकाचाच चेहरा त्याबद्दल बोलत होता. सगळ्यांची चुप्पी भंग करण्यासाठी मी अचानक  विचारले "तुम्ही देवाला कोणत्या लिमिट पर्यंत मानता ?"


माझ्या प्रश्नाने जवळपास सगळेच चकित झाले. हा प्रश्न कालच्या विषयाला  सुसंगत नव्हताच मुळी. त्या स्तब्धतेचा  भंग निशाने केला..


निशा : Honestly speaking, I am speechless on this point, so no comment 🙏🙏🙏


राणी : मी आता इतकचं लिहते की मी देवाला सृष्टीत बघते .


मनिषा : देव ...  जेव्हा मी खचते, माणसांवरून विश्वास उडतो तेव्हा

मला जगण्याचा आधार वाटतो तो म्हणजे माझा देव...

कशाही परिस्थितीत तग धरून रहायची हिंमत देते ,

अपयशाने न खचता पुन्हा भरारीसाठी सज्ज ज्यांच्या विश्वासावर होते तो म्हणजे माझा देव ...

माझ्या साठी तो सदैव आहे मला प्रेरणा देत, जगण्याचे बळ देत ज्याच्याजवळ मी मनातली कोणतीही गोष्ट बोलते, एकटीच भांडते, चर्चा करते, तोडगा काढते तो म्हणजे माझा देव...

मला माहिती आहे जे त्या दगडावर विश्वांस ठेवत नाही ते देवही माननार नाही, माझा आग्रही नाही पण

जी गोष्ट तुम्हाला पडतांना सावरते ,

चुकल्यावर अनुभव देते,

जिंकण्याची ताकत देते,

तो दगड असो की माणूस ,

पशू प्राणि वृक्ष काहीही ,

तो माझ्यासाठी माझा देवच आहे...


माझी माझ्या गजाननावर असिम श्रद्धा आहे ज्या परिस्थितीत मी व्यथित होते किंवा मला परिस्थिती सांभाळता येत नाही अशा वेळेस मी सर्व त्यावर सोपवते आणि मला मार्ग सापडतो ...

कदाचित तो मार्ग माझा मलाच सापडत असेल पण जेव्हा मी पूर्ण शरण जाते तेव्हा माझ्यातली मी मला नव्याने सापडते आणि हाच माझ्यासाठी माझा देव आहे ...

या रोबोटिक जगात जेव्हा सर्व कामे यंत्राने होतात तरीही मन अशी गोष्ट आहे ज्यांचे अजून यंत्र झाले नाही ...

तो हसतो रडतो झुरतो बोलतो अदृश्य असूनही आपल्या तालावर नाचवतो अश्या स्थितीत कोणीतरी पाहिजे जे त्याला बळकटी देईल . स्थिर ठेवेल त्याला आई सारखे वळण लावेल . ती आई म्हणजे माझ्यासाठी माझा देव आहे ...

श्रध्दा असणे म्हणजे अंधश्रद्धा नाही, हेही तेवढेच खरे आहे ...

माझा देव त्या पाण्यात खळाळतो,

क्षितीजांवर रंग उधळतो ,

आसमंत डोळ्यात साठवते ,

वाऱ्यासवे गाणे गातो ,

जीवनाला जीवन म्हणून सांगतो,

कर्तव्याची जाण देतो ...

हो तो माझा देव आहे ...

हो तो माझा देव आहे...


सचिन : *कुठे देव पहिला?*

माने भक्ती असे अंतरी पण

देव आहे का कोणी पहिला

आला काळ जेव्हा नेण्या

कोठे मग तो लपून राहिला


जीवांचा इतका खेळ

जो त्याचे दारी खेळला 

चेंगारले ते कित्येक देह

तेव्हा तो भक्ता कसा विसरला


दर्शनासाठी जर त्याचे

द्यावया लागे जिथे प्राण

आहे का तो खरं तिथे

आता तरी हे सत्य जाण


का शोधसी तिथेच देवा

अंतरी ही तो विराजमान

देव आहे सर्वत्र ना देवळात

सत्य हेच आता तरी जाण 


माय बाप ही आहे देव

देव तिथे जिथे असे दया,नम्रता

मिळे अस्तित्व तिथे त्याचे

जिथे असे प्रेम,त्याग ,ममता


मोहन दा : देवाला मानण्याची मते आप आपल्या परीने वेगवेगळी आहे, कोणी म्हणतात देवाचे अस्तित्वच नाही तेव्हा मग प्रश्न पडतो, की सृष्टी आपोआप तयार झाली का..? राम ,कॄष्ण , शंकर, विष्णु,इंद्र, काली, हनुमान, आताच्या काळात, गजानन महाराज, साईबाबा ,ताजुद्दीन हे झालेच नाही म्हणतात.     लोक जरी हे मानत नसतील तरी मी देवाला मानतो कारण , पाच लोकांना कुटुबातील चारचाकी सहा पल्टी खाल्यावर खरोच न लागणे म्हणजे देवानेच वाचवणे होय, आमचे दुसरे आयुष्य समजावे हे



उर्मी: देव ही संकल्पना खूप अफाट आहे.. आपल्या मनाला उभारी देणारी पॉसिटीव्ह उर्जा म्हणजे देव.. 

माझी देव ह्या संकल्पनेवर नितांत श्रद्धा आहे..

म्हणूनच भुताखेतांवर ही आहे..

मला देवाबद्दल जितकी आत्मीयता वाटते तितकीच भीती भुतांबद्दलही वाटते 😊



अनघा : देवाला मी कायमच माझ्या अवतीभवती पाहते. अदृश्य असला तरी जवळ वाटतो. मनाला दिलासा देतो. प्रचंड श्रध्दा आहे देवावर. माणसातही देव कधीकधी दिसून येतो. आशेची पणतीही देवच मनात जागृत ठेवतो. स्वतःच्या अंतरंगातही देव मला आढळतो


वर्षा : मंदिरातला देव कधी माझ्यासोबत बोललाच नाही अन देवाचा उदे उदे करणारे माणसाला कमी लेखल्याशिवाय राहत नाही .

डेबूजींसारखाच माझा देव सुद्धा माणसातच आहे .

श्रद्धा जगायला शिकवते मन शुद्ध  होते साकारात्मकतेमुळे ...पण गावातली लोक डोक्याबाहेरची विचारसरणी आहे .


सगळ्यांचे देवाबद्दल चे निकोप विचार मी ऐकत होती . पण मला हवे होते ते उत्तर मिळत नव्हते. शेवटी न राहवून मी म्हणाले 


देव मीही मानते मैत्रिणींनो.  फक्त मी त्याकडे एक +ve ऊर्जा म्हणून पाहते.  देव आणि दानव . एक +ve , सुदृढ पॉवर किंवा विचारधारा तर दानव ही वाईट , दुष्ट वृत्तीची विचारधारा.   कदाचित सायन्स स्टुडंट असल्याने अस समजत असेन मी .  कुणी त्याला सगुण रूप दिले कुणी निर्गुणाचा पूजक आहे . 

ह्याच देवाने आपल्याला शरीर दिले . कुणी पुरुष झाला कुणी स्त्री जन्म घेऊन आली .   


त्या जन्मदात्या ने म्हणजे  देवाने पुरुषाला आणि स्त्रियांना एकमेकांचे पूरक बनविले. म्हणजे कुणी एकटा पूर्ण नाही . एकमेकांशिवाय ते दोघेही अधुरे आहेत .


स्त्री ला सृजनशीलता दिली आहे. म्हणजेच नव उत्पत्ती ची देणगी . पण त्यासाठी तिच्या शरीराला विशिष्ट ऋतु चक्रातून जावे लागते.  त्या शिवाय नव निर्मिती होणे नाहीच . असे असताना ह्या निसर्ग चक्रातून जाताना स्त्रीला आजही विचित्र वागणूक का दिली जाते?


त्याही पुढे जाऊन एखाद्या धार्मिक कार्य प्रसंगी जर तिची पाळी येणार असेल तर तिला pills घ्यायला का भाग पाडतात? त्यात देवाने काय येऊन सांगितले ? ह्या कुप्रथेपायी एका मासूम जीवा ला आपले प्राण गमवावे लागले. त्या घटनेची मी दुर्दैवी साक्षीदार आहे.  खरच  माणसाला आपला जीव गमवावा लागला तरीही चालेल पण देव कोपु नये म्हणून अघोरी उपाय अवलंबिले पाहिजे का ?


म्हणून माझा प्रश्न होता  तुम्ही देवाला कोणत्या लिमिट पर्यंत मानता ?


सगळेच एकदम स्तब्ध झाले होते . आणि  अचानक सगळ्यानीच एकदम गलका केला. कोण होती ती मुलगी ? कुठली घटना आहे ही ?


उद्या सगळ्यांना सांगीन असे प्रॉमीस करून मी विषय संपवला . आता आमराई फिरायला जायचे आहे ह्याचीही आठवण करून दिली . त्यामुळे आन्हिके आटोपायला  सगळेच पळाले. 



...क्रमशः 


वाचक वर्ग तुम्ही दाद दिली नाही तर तर माझा स्त्री जागृतीचा प्रयत्न व्यर्थ गेला असे वाटेल. स्पेशली स्त्री वर्गा कडून माझ्या फार अपेक्षा आहे . कमेन्ट,  स्टिकर भरभरून द्या ..



©️®️सौ मंजूषा श्रीकांत अपराजित 



Thursday, 28 April 2022

स्त्री जन्मा ही तुझी कहाणी ...बदलत्या संकल्पना आणि छेद देणार्‍या रूढी

 आमचा एक मस्त ग्रुप आहे.  लिखाण आणि वाचन करणार्‍यांचा. अगदी ६४ वर्षापासुन ते लग्नाळु वयाच्या मुलामुलींचा ग्रुप.  

वयाची तफावत  आम्हाला जाणवतच नाही कारण इथे प्रत्येकाच्या विचारांची योग्य दखल घेतल्या जाते.  भांडण आणि वाद इथे वर्ज्य आहे. त्यामुळेच आम्ही एकमेकांना प्रेमाच्या धाग्याने घट्ट धरून आहोत . असो. तर आमचा हा ग्रुप आज मस्त फिरायला आला आहे .  रोजच्या कामाच्या  धबडग्यात सगळेच पिचले होते . म्हणून आम्ही सर्वानी  मिळून  ठरवले की कुठे तरी शांत शांत  ठिकाणी दोन दिवस जाऊ या . म्हणून भंडारा जिल्ह्यातील अंभोरा ह्या गावी आम्ही आलो आहोत . 

शांत चांदण्यांची रात्र आहे. समोर वैनगंगा आपल्या गतीने  वाहते आहे. तिच्या पाण्याच्या खळखळाटाचा आवाज नीरव शांततेत अजूनच कर्णमधुर वाटतो आहे. सगळेच भारावलेले. निसर्गाच्या मनोहर रुपात रमलेले.


अशावेळी गप्पांचा विषय वळला  gender equality  कडे . ज्ञानु खूप creative आहे. सतत डोक्यात नव नवीन विचार, संकल्पना आणि त्यावर अंमलबजावणी करण्याची तिची धडपड वाखाणण्याजोगी आहे. म्हणूनच आमच्या ग्रुपची ती लाडोबा नंबर वन आहे .


ज्ञानु एकदम सरसावून बसली आणि म्हणाली :By all your respect दादा.....एक प्रश्न विचारते .... scientifically कोण prove करेल स्त्री ही सहनशक्ती चे दुसरे रूप आहे ???

तिची आणि पुरुषांची भावनिक, मानसिक, सामजिक सर्वच गरजा सारख्या....काही शारीरिक फरक सोडले त तर.....हे जे पुरातन काळापासून बिंबवल्या जाते ना ते बंद व्हायला हवे आधी....

We are not the superior.... We are just human being....Just a human being...

प्रत्येकाने आपल्या मुलीचे संगोपन करतांना हे सांगा तिला....तुझी आणि तुझ्या भावाची, तुझ्या नवऱ्याची इच्छा ,जिद्द, जगण्याचा अधिकार,कर्तव्य आणि सहनशक्ती सर्वच समान आहेत म्हणून.....

माफ करा दादा...तुम्हाला क्रॉस करत नाहीये....

Gender equality साठी धडपडणारी व्यक्ती म्हणून बोलत आहे.


सर्वच जण तिचे विचार शांतपणे समजून घेत होते. 

मोहनदा चा विचार जरा वेगळा होता.बाई मध्ये सहनशक्ती जास्त असते असे त्यांचे मत होते .


मी तिला म्हणाले ...I fully support you . पण समाजमन बदलणे जवळपास अशक्य वाटते.  मला वाटत अजून ५ -१० पिढ्या खपल्या की घडले तर घडेल. कदाचित आपण founder members असू.


मोहनदा: मी प्रुव्ह करु शकतो, लवकरच एक लेख सादर करिल, स्त्री सहनशक्तीचे दुसरे रुप आहे


ज्ञाना : नक्की दादा...फक्त ते scientifically हवं....

जुने दाखले किंवा उदाहरणे नकोत......कारण ते या समाजाचे प्रतिनिधित्व करते....आजवर चालत आलेल्या परंपरांचे प्रतिबिंब दाखविते...


आम्ही त्या समाजाविषयी बोलतोय जो घडावा हा मानस आहे.


सीतेच्या गोष्टी सांगून सांगून आमच्याकडून नकळत अग्नीपरिक्षेची अपेक्षा केली जाते...


मोहन दा : आजची स्त्री आधुनिक जरी असली तरी, तिच्या वॄत्तीत असा फारसा बदल झाला नाही, अग्नीपरिक्षा देणाऱ्या काही स्त्रिया आहे काही नाही आहे. आणि सगळ्याच स्त्रिया सहनशक्तीवाल्या नाही, काही अरेरावित गेल्या ( अरेरावी हा शब्द इथल्या स्त्रियांसाठी नाही, समाजातील काही स्त्रियांशी निगडित आहे)काही सहनशक्ती म्हणजेच सहणार्या आहेत.


Dnyanu : याला तिची सहनशक्ती नाही दादा जबाबदारी म्हणतात.....ती कितपत सहन करू शकते हे विचारण्याची तसदी समाजाने घेतलीच केव्हा???..तिच्या सहनशक्तीच्या मर्यादा परस्पर ठरवून मोकळा झाला.  तुमचंच वाक्य..


"सगळ्यात स्त्रिया सहन शक्तिवाल्या नाही, काही अरेरावित गेल्या..."


ही च भीती!!!!....मी सहन केले नाही तर मुजोर ठरेल....तिला सर्वच सहन करायला लावते.

सहन करत जाणे....आणि अरेरावी करणे.....या दोघांच्या मध्ये तिसरी जागाच नाही का?


मोहन दा: तसे नाही ताई, आज समाज बदललेला आहे प्रत्येक ठिकाणी असे नाही आहे, स्त्रीकडे पूर्वी पासून त्याच नजरेने पाहिले जाते की, ती घरचा स्वयंपाक,  झाडुपोछा, घरचे सगळे काम फक्त स्त्रीनेच करावे,मुलाबाळाला तिनेच पहावे


ज्ञाना : फक्त घरातील कामाची जबाबदारी इतकाच विचार नाही स्त्री पुरुष समता मध्ये... बाईच्या गोष्टी चुली पासून सुरू होतात...आणि चुलीवर येऊन थांबतात.


निशा : प्रत्येक गोष्टीचे बरेच पैलू असतात आणि प्रत्येकच मुद्द्यावर प्रत्येकाचे विचार सारखे असतील असे नाही.. प्रत्येकाने आखो देखे दाखलेही दिलेले आहेत.. तरीही मला "तुच तुझी कट्टर शत्रू" हा मुद्दा योग्य वाटतो..


ज्ञाना: *डिस्कशन शेवटी कोणत्या टॉपिक वर येऊन थांबेल सांगू.....स्त्री आणि पुरुष दोघेही शेवटी एकमेकांशिवाय अपुरे आहे.....एकमेकांना परिपूर्ण करतात...वैगेरे..."*

मला नेमके तेच म्हणायचे आहे ..स्त्री पुरुष एकमेकास पूरक आहेत ना..काही  फरकासह(यात शारीरिक म्हणायचे आहे मला) त्यांची निर्मिती झाली आहे ....बस संपला विषय.....त्यात मध्येच मग स्त्री ला आदिशक्ती,सहनशक्ती....वैगेरे विशेषणे का लावता??*


वर्षा : ज्ञाना ताई च्या मताशी मी सहमत आहे .समानता हि फक्त पुस्तकात अन फार कमी लोकांमध्ये आहे .मंजूताईने पण बरोबर म्हणजे खरंच सांगितलं आहे .समाजाकडून अपेक्षा करूच नये हे माझं मत आहे .आपण समानतेची सुरवात स्वतःपासून करू शकतो .कारण समाज म्हणजे त्यात आपणही आहोतच .


चर्चा खूप जोमात चालू होती. वेळेचे भान कोणालाच नव्हते . प्रत्येकचजण हिरीरीने आपापली मते मांडत होता पण त्यात दुसर्‍याला खाली खेचायची भावना अजिबात नव्हती. रात्रीचा जवळपास दुसरा प्रहर  संपत आला होता. ज्येष्ठत्वाच्या नात्याने आवर घालायला हवाच होता. 

लगेचच सगळ्यांना थांबायची विनंती केली आणि प्रत्येकच जण निद्रादेवीच्या अधीन झाला.


........... क्रमशः 


माझ्या तमाम वाचकांनो तुमचा प्रतिसाद अपेक्षित आहे . वाट पाहते आहे 



Wednesday, 20 April 2022

पत्र तरूणाईला

चि. तरुण / तरुणी  (१०/१२ वी पास झालेले )

अनेक शुभाशीर्वाद---

"तुमच्या वाढदिवसा प्रीत्यर्थ अनेक शुभ कामना"

चमकला का ? प्रश्न पडला असेल ना आमच्या सगळ्यांचाच वाढदिवस एकाच दिवशी कसा ? 

बघा. तुमच्यातील अनेकानी १० वी पास केली , बरेच लोकां नी १२ वी पास केली. आज पर्यंत आई बाबांच्या सुरक्षित पंखाखाली तुम्ही होतात . पण  जसा तुमचा निकाल लागला तस तुमच्या विचारांना चालना मिळाली . सायन्स घेऊ  की कॉमर्स ? शाळेतच अ‍ॅडमिशन घेऊ की कॉलेज मध्ये?  माझ्या मित्राने जिथे अ‍ॅडमिशन घेतली तिथेच घेऊ का ? बाबांच्या पॉकेटला ह्या कॉलेज चा खर्च झेपेल का? विचारांच्या आवर्तनात अडकले की राव तुम्ही.  म्हणजेच बुद्धीला चालना मिळाली की . बुद्धीची वाढ होतेय . जिथे वाढ होतेय तिथे वाढदिवस साजरा झालाच पाहिजे . म्हणून  तुम्हाला वाढदिवसाच्या अनेकानेक हार्दिक शुभेच्छा. 

आज तुम्ही जितक्या वर्षांचे झालात तितकी गेलेली वर्षे तुम्हाला फक्त वयात वाढ झाली ह्याचीच जाणिव करुन देत गेली .

अगदी लहानपणी वाढदिवसाचा अर्थ म्हणजे मौज- मजा-  मस्ती,  खूप सारे प्रेझेंट,  आवडीच्या वस्तु खाणे आणि सर्वांच्या कौतुकाचा केंद्र बिंदू बनणे एव्हढाच होता . सगळ्यात मुख्य म्हणजे आई बाबानी ह्या सर्व गोष्टी तुम्हाला मनसोक्त उपभोगू दिल्या आणि तुमच्या आनंदात आनंद मानला.

पण...

आज तुम्ही ज्या सीमारेषेवर उभे आहात त्या ठिकाणी तुमची स्वतः ची ओळख तुम्हालाच नव्याने करून देण्याची गरज आहे.

यापुढे येणारा प्रत्येक वाढदिवस तुमच्या हातात एक एक नव्या  जबाबदारीचे प्रेझेंट देऊन जाणार आहे.  ते पेलण्यासाठी आपले तनच नव्हे तर मनही बळकट असणे आवश्यक आहे. तनामना च्या  स्वास्थ्यासाठी स्वतः वर विश्वास ठेवण्याची क्षमता असली पाहिजे .

समोर उभे राहिलेले कोणतेही आव्हान स्वीकारून  ते यशस्वी रित्या मी पूर्णत्वास नेईन हा आत्मविश्वास असणे आवश्यक आहे.  एक मिनिट...थांबा..

आत्मविश्वास म्हणजे over कॉन्फिडन्स नव्हे .

हा आत्मविश्वास जागृत ठेवण्या साठी जीवनावर श्रद्धा ठेवायला शिका. श्रद्धा ठेवा देवावर, आईबाबां वर , गुरुजनां वर .

मंडळी कंटाळलात का ?

सगळ्याच गोष्टी  एकदम तुमच्यावर लादणार नाही . एकेक घास चर्वण करून खा . पचवा.  मगच पुढचा मेवा मिळणार तुम्हाला.

.......स्वस्थ रहा मस्त जगा.❤🧡❤🧡❤
   
                                ..... तुमची लाडकी ताई . 

*ता.क. उद्या पुन्हा भेटू*

©️®️सौ मंजूषा श्रीकांत अपराजित 
💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦

पत्र 2

माझ्या तरुण मित्र-मैत्रिणींनो, 

अनेक शुभाशीर्वाद ,

माझे मागचे पत्र वाचून तुमच्या मनात काही ना काही विचार तरंग निश्चितच उमटले असणार. शंभर टक्के खात्री आहे मला . (ह्यालाच मी आत्मविश्वास म्हणतेय) म्हणजे बघा तुमच्या मनाला , डोक्याला विचार करायची सवय लावायची हाच माझा उद्देश होता . आणि आज तुमच्या चेहर्‍या कडे पाहून मी सांगू शकते माझा उद्देश पूर्ण झाला . माझा आत्मविश्वास दुणावला आहे. असो.

एखादे कार्य हातात घेतल्यावर ते पूर्णत्वास नेण्यासाठी काही पायर्‍या आपल्याला चढाव्या लागतील. काही गुण अंगात बाणवायला लागतील.

उत्तम नियोजन : वेळेचे , कष्टाचे, आणि आवश्यकता असल्यास आर्थिक नियोजनही करावे लागेल . आपल्या नियोजनात कुठेही त्रुटी राहू देऊ  नका . ह्या ठिकाणी आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे उदाहरण डोळ्यासमोर ठेऊ या.  कुठलीही मोहीम राबवताना त्यांचा बारकाईने अभ्यास केला जात असे. उद्भवू शकणार्‍या सर्व संकटांचा आढावा घेऊन त्यावर उपाय योजना आधी पासूनच ठरवली जात असे. येवढे करूनही जर अपयश येते आहे असे वाटल्यास दुसरा मार्ग कोणता निवडायचा हेही पाहिले पासूनच ठरलेले असायचे.
तुमच्याच शब्दांत सांगते - एखादी गोष्ट साध्य करताना प्लॅन A बरोबरच प्लॅन B तय्यार ठेवा . कारण यश मिळविण्यासाठी ७५ ते ८० टक्के कष्टाचे असले तरी उरलेले टक्के नशिबा चेही असतात.  प्लॅन A फसला तरी  प्लॅन B प्रमाणे लगेचच कृती करायला सुरवात करा . 

लक्षात ठेवा अपयश आले म्हणजे लगेचच जीवन संपवायची वेडी  घाई करू नका.  

तुम्हाला तो अधिकार कोणीही दिला नाहीय.

बाळानों, अशाच विफल प्रसंगी तुमची जीवनावरची , देवावरील , आई - वडील , गुरुजनांवरची श्रद्धा  कामाला येणार आहे. ते त्याप्रसंगी रागावले तरी त्यांच्या अंतर्मनात तुमच्या यशाचीच कामना असते .

श्रद्धा आणि प्रार्थना आपल्याला जगण्यासाठी फार मोठे बळ देत असतात. आपल्याला जीवनाची उज्ज्वल बाजू दाखवत असतात. आपल्या मनाला वाम मार्गाचा उपयोग न करण्यासाठी आवर घालत असतात.  येणारे वाईट वा चांगले अनुभव सहन करण्याची ताकद देत असतात . आपली सहनशीलता वाढवीत असतात .

एकदा का सहनशीलता वाढलीय की आपोआपच माणूस आपल्यात सद्गुणांचा संग्रह वाढवीत जातो .

माझ्या विद्यार्थी मित्रानो , तुम्हाला असे सद्गुणांचा पुतळा  होऊन जगभर यश पताका मिरवताना मला पहायचे आहे . आणि हे सुख, ही गुरू दक्षिणा तुम्ही मला नक्की देणार ...

यशाचा मंत्र : मेहनत करने वालोंकी कभी  हार नाही होती.

    .                    . ..तुमची लाडकी ताई .

©️®️  सौ मंजूषा श्रीकांत अपराजित 
💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦

पत्र 3

नमस्कार तरुणाई, 

आश्चर्यचकीत झालात ना .ताई एकदम नमस्कार म्हणू लागली. काही थांग पत्ताच नाही लागत हिच्या मनाचा.   असे नाही बाळांनो . मोठे झालात आता तुम्ही.  आपली हिंदू संस्कृती आहे ना ती फार श्रीमंत आहे . आयुष्याच्या प्रत्येक काना कोपर्‍या चा विचार त्यात केला गेला आहे .

लालयेत् पञ्च वर्षाणि , दश वर्षाणि ताडयेत्।
प्राप्ते तु षोडशे वर्षे, पुत्रं मित्रवदाचरेत्।।

सोळा वर्षाच मूल झाले की त्याला मित्रा प्रमाणे वागवावे. तुम्हीही आज त्याच सीमारेषेवर उभे आहात. त्यामुळे नमस्कार. तसेच आज हे शेवटचे पत्र. तुम्ही degree मिळवून याल तेंव्हा पुन्हा भेटूच . तोपर्यंत हे पाथेय (शिदोरी) तुम्हाला दीप स्तंभा प्रमाणे मार्गदर्शक ठरो.

ह्यावेळेपर्यंत तुमच्या शाळा कॉलेज सुरू होऊन त्यात  तुम्ही स्थिरावला असाल . मोकळे आभाळ तुम्हाला उडायला मिळाले आहे . खूप उंच भरारी घ्यायची आहे तुम्हाला . आणि इथेच , ह्या वळणावरच सावध ही रहायचे आहे. तुमच्या मार्गात  अनेक आमिष आहेत. वेगवेगळी व्यसन , मुला - मुलीं मधील आकर्षण , पैशासाठी वाम मार्गाचा  वापर , आई - वडिलांची दिशाभूल करणे  इत्यादी इत्यादी. बाबानो कटाक्षाने दूर राहा ह्या सगळ्यां पासून . समजा एव्हडे करूनही चूक झालीच तर ती अगदी लगोलग आई बाबांना कळवा. कदाचित ते रागवतील ही. पण ते तुमचे योग्य मार्गदर्शनही करतील.  आकर्षण वाटणे हे कितीही नैसर्गिक भावना असली तरी,  त्याच्या आहारी जाण्याची ही ती वेळ नाही . अजूनही तुम्ही शारिरीक,  मानसिक आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम नाहीत. त्यामुळे जागृत रहा.

तुमच्या आई बाबांनी तुम्हाला आयुष्यात खूप यश, सुकिर्ती , आयुरारोग्य मिळो अशीच कामना केली . त्याच बरोबर आपली म्हणता येतील अशा माणसांचा सहवास लाभो हा ही विचार केला असेल.  त्या दृष्टीने शक्य तितके प्रयत्न ही केले असतील.  पण ह्यापुढचा मार्ग तुमचा आहे .

बाळांनो,  यश मिळविण्याचा मार्ग फारसा सोपी नाही . अमाप कष्टानी तो पार करता येतो. प्रसंगी अत्यंत प्रिय गोष्टींचा त्याग करावा लागतो .

हा वाढदिवस तुम्हाला सांगतो आहे .. ह्या मार्गावरील तुमचा प्रवास सुरू झाला आहे.  त्यागाची सवय करा .  आळस, झोप ह्याना त्यागा. मौज,  मजा , मस्ती यांना तात्पुरते दूर ठेवा . खूप कष्ट करा आणि यशश्री  खेचून आणा. 

रोज रात्री झोपण्या पूर्वी  आपल्या मनाला प्रश्न विचारा .....  काल ज्या ठिकाणी मी उभी/उभा होतो त्या पुढची पायरी मी चढली/चढलो का ?

ती पायरी असावी ... उच्च विचारांची,  श्रद्धेची , आत्मविश्वासाची,  यशाची , कीर्तीची, समाधानाची.

विद्यार्थ्यांनों, समाधानाने जगता आले  पाहिजे. कोणाच्याही आनंदात आनंद मानता आला पाहिजे .  दुसर्‍याच्या चांगल्या गुणांचा आदर करता आला पाहिजे . स्वतः ची स्तुती स्वतः करू नये. ती दुसर्‍यां नी केली पाहिजे .

"शुभ चिंतावे, शुभ इच्छावे , वचनी  शुभ बोलावे ,
शुभ कर्माच्या सामर्थ्याने कर जीवन सोने."

पुन्हा तुमच्या सगळ्यासाठी संपूर्ण सुखाची कामना ईश्वरचरणी करून थांबते. 

पुन्हा मला भेटायला याल ही आशा आणि इच्छा.

तुम्हाला निरोप देताना मी फार व्याकुळ झाली आहे . पण प्रयत्न पूर्वक तुम्हाला निरोप देते .

सुखी व्हा .

            ...... तुमची मार्गदर्शिका,  शिक्षिका     आणि   .......लाडकी ताई .

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

✍✍✍✍®️सौ मंजूषा श्रीकांत अपराजित 








Welcome

संस्कारित नारायणी : सौ. ललिताशास्त्री विनायकशास्त्री आर्वीकर

 ती माणसच निराळी असतात , पूर असतो त्यांच्या स्वभावात,  किनारा सोडतात तेंव्हा नदीहून बेफाम होतात , कोसळतात खोल तेंव्हा किती उंच जातात . हृदय ...