Friday, 14 July 2023

आई नसलेले घर : पर्व १ : भाग ३

 रमाकांत ने घड्याळ पाहिली , त्याचीही निघण्याची वेळ झाली होती .  घरात येऊन त्याने आपली बॅग उचलली,  बाबांना सांगून त्याने दाराला कुलूप घातले आणि झपाझप बँकेच्या दिशेने चालू लागला .  


बँकेच्या दारातच स्मिता गोडबोले ने त्याला गाठले आणि लालभडक लिपस्टिकने रंगवलेल्या ओठांचा चंबू करत ती त्याला म्हणाली , " गुडमॉर्निंग  सर...


तिच्याकडे सपशेल दुर्लक्ष करत  त्याने मस्टर वर सही केली आणि आपल्या खुर्चीकडे वळला.


उगीचच मनातल्या मनात त्याने स्मिता गोडबोले आणि कालच्या मुलीची तुलना केली . 


आणि मग आपण असे का करतोय हे त्यालाच समजेना . आपल्याला तर साधे तिचे नावही माहिती नाही .


काय असेल तिचे नाव ? .....


आपल्याच विचारांचे त्याला आश्चर्य वाटले.  दुसर्‍याच क्षणी आपले विचार झटकून टाकत तो कामाला लागला. 


पूर्ण दिवसभरात त्याला विचार करायला फुरसत मिळाली नाही .  त्याच्या हातात आता फक्त पाच  दिवस  होते.   त्यातला एक दिवस आपल्यासाठी राखून ठेवावा असा त्याचा विचार होता . म्हणजे चारच दिवसात काम पूर्ण करणे त्याला भाग होते.  त्यामुळे जग काय करताय किंवा काय म्हणतय  ह्याच्याशी त्याला काही देणे घेणे नव्हते.


एकदम लंच टाइम झाला तेंव्हा  तो उठला .  पाच मिनिटात जेवण आटोपून तो पुन्हा कामाला लागला .  चार वाजता  प्यूनने आणून ठेवलेला चहा ठंडा झाला तरी त्याचे त्याकडे लक्ष नव्हते.   शेवटी सहा वाजता प्यून ने त्याला दुसरा चहा आणून देऊ का असे विचारले तेंव्हा तो भानावर आला. त्याला हो म्हणत त्याने टेबल आवरायला सुरवात केली.


प्यून ने चहा आणून दिला तेंव्हा तो रिलॅक्स होऊन बसला होता .  मस्त पाय लांब करून तो चहा प्यायला आणि तडक बॅग उचलून घराच्या दिशेने चालू लागला.


घर उघडताच त्याला दिवसभराचा थकवा जाणवला . फ्रेश होऊन पंधरा वीस मिनिटे पाठ टेकवायची असा  त्याचा विचार होता.  रोजच्या सवयीने त्याने बाबांच्या खोलीकडे डोकावून पाहिले आणि तो हतबुद्ध झाला .  टेबलवर सगळीकडे चहा सांडला होता .  त्याचे ओघळ सर्वत्र खोलीभर पसरले होते.  दुपारचा नाश्ता अर्धवट डिशमध्ये आणि अर्धा खाली सांडला होता .  आणि बाबा झोपून गेले होते .


सगळाच शीण विसरून त्याने पहिल्यांदा दिवा लावला आणि  बाबांना जागे  केले.  पहिल्या आवाजातच त्यांनी डोळे उघडले म्हणून त्याला हायसे वाटले .   कितीही काहीही झाले तरी ते त्याचे जन्मदाते होते . त्यांनी प्रेम दिले नसले तरी तो त्यांचे बोट धरूनच मोठा झाला होता .  सवयीने माणूस प्राण्यांवर ही जीव लावतो. इथे तर ते प्रत्यक्षात  वडील होते .


"काय झाले बाबा तुम्हाला ?" त्यानी कापर्‍या आवाजात विचारले. 


"अरे,  मला खाता खाता झोप लागून गेली. बहुदा झोपेत चहाच्या कपाला हात लागून सांडला चहा."


"ठीक आहे , तुम्हाला काही त्रास नाही ना होत ?"


त्यांनी नकारात्मक मान हलविली तसा तो तिथून उठला . लगबगीने  कपडे बदलून त्याने बाबांची रूम आधी स्वच्छ केली .  बाबांना स्पन्जिंग करून दिले . सगळ्या कामाचा निपटारा करता करता आठ वाजून गेले .  दिवसभराचा थकवा त्याला आता जाणवू लागला.  अजून स्वयंपाक राहीलाच होता .  त्याला काही एक करायची इच्छा नव्हती.


त्याने शांतपणे फोन उचलला आणि कालच्याच खानावळी मध्ये फोन लावला.


"हॅलो,  मी रमाकांत देशमुख बोलतोय , इंद्रप्रस्थ कॉलनी मधून ."


"हं,  हं,  बोला बोला . मी सुमती करंजकर बोलतेय गुरुदेव खानावळी मधून ." एक सुस्पष्ट बायकी स्वर उमटला. 


"मी कालच तुमच्याकडून  डब्बा मागवला होता.  तुम्ही मला आजही प्लीज देऊ शकाल का ?  खरं म्हणजे मला उशीर झालाय कळवायला पण मी रिक्वेस्ट करतो तुम्हाला ."


" अहो त्यात काय येव्हडे ? पाठवते की तुम्हाला डब्बा.  आमचे कामच ते आहे. पण स्पष्ट सांगते आमच्या नियमाप्रमाणे पहिल्या दिवशी आम्ही ऐंशी 

रुपये पर हेड घेतो त्यानंतर मात्र शंभर रुपये पर हेड घेतो . चालणार आहे का ?  आणि चिल्लर साठी अडवू नका. नेमके पैसे द्या. लक्षात ठेवा आम्ही टीप स्विकारत नाही. "


येवढी रोखठोक बोलणे ऐकण्याची रमाकांतला सवय नव्हती.  उलट बोलण्याची उर्मी त्याने दाबून ठेवली.


"चालेल चालेल आणि थँक्स हं. वेळेवर सांगूनही तुम्ही माझी अडचण दूर केलीत."


"ठीक आहे , पंधरा मिनिटात पाठवते डब्बा." असे म्हणून तिने फोन ठेवला.


लगोलग तिने डब्बा भरला . आपली लहान बहीण रेवतीला घेऊन ती निघाली सुद्धा. 


आपले मागचे बोलणे विसरून सुमती ने डब्बा द्यायचे कबूल केले  ह्याचे रमाकांतला आश्चर्य वाटले. 


पण सुमती मुळी होतीच  गुणी.  परक्याशी जेवढ्यास तेवढे बोलायचे. आपला कोणालाही अपमान करू नाही द्यायचा पण आपला व्यवसायही बुडू नाही द्यायचा.   


तिला आईचे कष्ट लवकरात लवकर दूर करायचे होते .  ग्रॅज्युएट,  पोस्ट ग्रॅज्युएट  होऊन नोकरी करायची होती .


समज आल्यापासून तिने आईचे अखंड कष्ट पाहिले होते.  प्रचंड हुशार असलेल्या वडीलांना पॅरॅलिसिस झाल्यामुळे अंथरूणावर हतबल होऊन पडलेले पाहिले होते . अतिशय करारी असलेल्या आईने न हरता त्यांची सेवा करत, कोणाचीही मदत न घेता सगळाच डोलारा सांभाळला होता . त्यांची तुटपुंजी पेंशन,  दोघी लहानग्या मुलींचे शिक्षण , वाढता खर्च, वडीलांच्या औषधांचा खर्च ह्या सगळ्या मोठ्या मोठ्या जबाबदार्‍या तिने खूप शांतपणे सांभाळल्या होत्या.


आईचा करारीपणा , वडिलांची हुशारी ह्यांचा उत्तम संयोग सुमती मधे  झाला होता .  आपल्या लहान बहिणीला सुद्धा ती  आपल्यासारखीच स्वयंसिद्धा बनवत होती. 


अगदी ह्या कारणामुळे तिने रमाकांतचे कालचे वागणे बोलणे मनावर घेतले नव्हते.  पंधराव्या मिनिटाला ती त्याच्या घरापाशी पोहोचली होती. तो ही तिची वाट पाहत बसला होता.  तिने त्याच्या हवाली डब्बा केला आणि त्याबरोबरच आपल्या खानावळीचे पत्रक त्याला दिले. त्यानेही निमुटपणे नेमके पैसे तिच्या हवाली केले.


"दादा , मी उद्या नऊ वाजता येते डब्बा घ्यायला " रेवती चिवचिवली.


त्यानेही हसून मान डोलावली .


बाबांचे ताट वाढता वाढता त्याने खानावळीचे पत्रक वाचले.  त्यात तिथले नियम काय आहेत ह्याची माहिती होती . त्याबरोबरच महिन्याकाठी डब्बा लावला तर खर्च कसा कमी पडेल ह्याचेही विवरण होते .  


त्या सगळ्याकडे दुर्लक्ष करत त्याने स्वतः चेही पण पान वाढून घेतले.  काल सारखेच आजचे ही जेवण चविष्ट होते .


दिवसभराचा शीण , आल्यावर बाबांची करावी लागलेली उस्तवार आणि आत्ताचे गरमागरम जेवण , ह्यामुळे त्याला चांगलीच गुंगी येऊ लागली होती. 


कशीबशी आवरा सावर करून तो झोपायला पळाला.  अंथरूणावर पडल्या पडल्या  मनाशीच उद्याच्या कामाचा कच्चा आराखडा  त्याने तयार केला. उद्या बँकेत लवकर जायचे आणि झपाट्याने कामाचा निपटारा करायचा .  त्यासाठी लवकर उठून स्वयंपाक आणि इतर कामे लवकर करावी लागतील.  त्यापेक्षा सुमती कडूनच डब्बा मागवावा का ? 


हा विचार मनात येताच तो स्वतः शीच दचकला .  किती सहजतेने आपल्याला तिचे नाव लक्षात राहिले ?  


आजवर कधीही मुलीं कडे  ढुंकूनही न पाहणारा रमाकांत सुमती चा विचार करत करत झोपी गेला .


उद्याची सकाळ रमाकांत साठी कशी असणारं होती ? सुमतीला तो डब्ब्यासाठी पुन्हा फोन करेल का ? 


पाहूया उद्याच्या भागात .....



🧚‍♂️ ❤️ 🧚‍♂️ ❤️ 🧚‍♂️ ❤️ 🧚‍♂️ ❤️ 🧚‍♂️ ❤️©️®️सौ. मंजूषा श्रीकांत अपराजित 



Thursday, 13 July 2023

आई नसलेले घर : पर्व १ : भाग २

 मागच्या भागात काय झाले ......


कामाच्या गडबडीत तो तहान, भूक , घर, बाबा, खानावळीचा डब्बा सगळेच विसरला.  आठ वाजले तसे प्यून त्याच्या आजूबाजूला घुटमळत उभा राहिला. पण त्याला काही फरकच पडत नव्हता.

त्यामुळे शेवटी त्याला आवाज दिला , " रमाकांत सर,  घरी बाबा तुमची वाट पाहत असतील ...."


आता  पुढे......


घाईघाईने रमाकांत बँकेतून बाहेर पडला .  दहा मिनिटात तो घरापाशी पोहोचला .  अंगणात सर्वत्र अंधार होता . फक्त समोरच्या हॉल मधला दिवा जळत होता . कारण ऑफिस मध्ये जाताना तो दिवा तो लावून जात असे .  बाबा चार पावलांशिवाय  जास्त चालू शकत नाही ह्याची त्याला पूर्ण कल्पना होती.


म्हणून ऑफिस मधे जाण्यापूर्वी तो त्यांची सगळी तयारी करुन ठेवत असे.   त्यांना डायपर लावून जाणे,  औषधे , पाण्याच्या बाटल्या, दुपारचा  चहा थर्मास मध्ये भरून ठेवणे,  बिस्किटे  अगदी सगळ्या वस्तु  सहजतेने ते घेऊ शकतील अशी व्यवस्था तो करून जात असे .


आज जास्तीच उशीर झाला म्हणून त्याने घाईघाईने कुलूप उघडले .  अंगणातला दिवा लावला.  बॅग जागेवर ठेवली.  समोरचा दरवाजा लावून तो फ्रेश व्हायला गेला.   


हातपाय धुवून  आणि कपडे बदलून तो बाबांशी  बोलायला येतच होता तोच दारावरची बेल वाजली.  ह्या वेळेला आपल्याकडे कोण आले असेल ह्याचा विचार करत त्याने दरवाजा उघडला . दारात एक २०-२१ वर्षाची सावळ्या रंगाची , धारदार नाकाची आणि अत्यंत तेजस्वी डोळ्यांची  तरुणी एका हातात टीफिन घेऊन आणि दुसर्‍या हाताने १० वर्षाच्या गोबर्‍या आणि हसर्‍या चेहर्‍याच्या बालिकेचा हात धरून उभी होती .


रमाकांत ह्या वेळेपर्यंत खानावळीतून डब्बा  बोलावलाय हे विसरून गेला होता .  त्या मुलीच्या हातातल्या डब्ब्या कडे पाहून आता त्याच्या लक्षात आले. घाईघाईने  त्याने तिच्या हातातून डब्बा घेतला आणि  तिच्यापुढे दोनशेची नोट धरली.  


" सर,  माझ्याकडे चिल्लर नाही.  तुम्ही आमच्याकडून पहिल्यांदा डब्बा घेतला म्हणून आमच्या नियमाप्रमाणे आजचा डब्बा ऐंशी रुपये पर हेड राहील.   त्यामुळे एकतर मला एकशे साठ रुपये द्या  किंवा उद्या डब्बा न्यायला येईन तेव्हा मला माझे पैसे द्या. " असे म्हणून लगबगीने ती परत फिरली.


दोन क्षण काहीच न सुचून रमाकांत तसाच उभा होता . पण लगेचच भानावर येत त्याने तिला आवाज दिला .


" अहो मिस,  नाही नाही , तुम्हीच मला नंतर वापस करा पैसे , नाहीतर ठेवून घ्या तुमच्याकडे .  उद्या तुम्ही याल तेंव्हा  मी घरी असणारं नाही . डब्बा इथे बाहेर ठेवलेला असेल ."


त्याचे शब्द ऐकताच ती नागिणी सारखी फुत्कारली, "सर , तुम्ही मला डब्ब्याचे पैसे नाही दिले तरी चालेल .  पण तुम्ही मला टीप देण्याचा प्रयत्न करू नका.  मी  मेहनतीचे पैसे घेते फक्त. फुकटचे पैसे नको मला. " 


तिचा रागाने लालबुंद झालेला चेहरा पाहून रमाकांत जरा दचकलाच .  आजवर त्याने अशी रणरागिणी  पाहिली नव्हती .  त्याच्या बँकेतल्या मुली त्याच्याभोवती लाळघोटेपणा करत फिरत असे .  त्यामुळे सगळ्यांनाच तो एकाच मोजपट्टीने मोजत असे. 


पण हे पाणी काही वेगळेच आहे हे त्याच्या लक्षात आले. नरमाईचे स्वरात तो तिला म्हणाला , " सॉरी, सॉरी , मला असे नव्हते म्हणायचे .  माझे शब्द मी मागे घेतो .  घाई गडबडीत मी असे बोलून गेलो."


त्याचा नरमाईचे स्वर ऐकून तिनेही शांतपणा धारण केला .  


तो म्हणाला , " हे बघा , तुम्ही सकाळी किती वाजता येणार आहात ? माझी बँक दहा वाजता चालू होते . मी साडे नऊच्या दरम्यान  निघून जातो . त्या आधी तुमचे येणे जमेल का ? "


"मी  नऊ वाजता येईन.  तेंव्हा  डब्बा आणि पैसे तयार ठेवा. " 

येव्हडे बोलून तिने बहिणीचा हात धरला आणि तरातरा निघून गेली.


हतबुद्ध होऊन रमाकांत थोडावेळ तिथेच उभा राहिला.  आतून त्याच्या बाबांनी त्याला आवाज दिला तेंव्हा भानावर आला .


" आज काय मला जेवण मिळणार आहे की नाही ? "  त्यांनी तुकड्या स्वरात रमाकांतला विचारले .


रमाकांत गुपचूप टिफिन घेऊन आत गेला . त्याने डब्बा उघडला आणि मस्त भरल्या  ढेणसाच्या भाजीचा घमघमाट घरभर पसरला .


त्याने पटकन बाबांचे ताट वाढले. गरमागरम भाजी,  पोळ्या , गरम आमटी , दह्याची वाटी , पापड , लोणचे  असे साग्रसंगीत जेवण पाहून तो फारच खुष झाला .  


त्या वासाने त्याची पण भूक खवळली. पटकन बाबांना वाढून त्याने आपले पण पान वाढून घेतले. 


बाबा सुद्धा इतक्या कमी वेळात  इतके सगळे पदार्थ रमाकांतने कसे बनविले ह्याबद्दल जरा आश्चर्यचकित झाले. पण काही न बोलता त्यांनी जेवायला सुरवात केली. 


खूप चविष्ट भोजन ते दोघेही खूप वर्षानी जेवत होते. त्यामुळे खूप आनंदाने ते  दोघे ही एकही शब्द  न बोलता पोटभर जेवले.


जेवण झाल्यावर बाबांना औषध देताना बाबांनी रमाकांतला शेवटी  विचारलेच . 

" आज कसे काय इतक्या कमी वेळात इतका सगळाच स्वयंपाक कसा करता आला तुला ? "


त्यांच्या प्रश्नाकडे सोयीस्कररित्या त्याने दुर्लक्ष केले .  बँकेतल्या कामाने तो अतिशय थकला होता . त्यात  गरमागरम स्वादिष्ट जेवणाने त्याला गुंगी येत होती.  कसेबसे कामे आटोपून तो झोपायला आपल्यासाठी खोलीत चालला गेला .


अंथरूणात पडल्या पडल्या तो निद्रादेवीच्या आधीन झाला.  रोज पेक्षा लवकरच तो झोपी गेला .


रात्रभर शांत झोप झाल्यामुळे सकाळीही तो लवकर  जागा झाला.  सगळे कसे प्रसन्न प्रसन्न वाटत होते त्याला. 


स्वतःशीच आश्चर्य करत तो उठून स्वयंपाक घरात आला .  ओट्यावरचा  पसारा पाहून त्याला आत्ता जाणवले , अरे आपण पोटभर जेवलो आणि आवराआवरी न करताच झोपायला गेलो.


बाकी जेवण उत्तमच होते. चला पटापट आवरायला  हवे.   


सवयीने त्याचे हात भराभर कामे उरकत होते.  पटापट त्याने स्वयंपाक केला.  कालच्या चविष्ट भोजनाची चव अजूनही जिभेवर रेंगाळत होती. एकदा त्याच्या मनात विचार आला लावून घ्यावा का पर्मनंट डब्बा ?  आपले काम तरी वाचेल .  पण त्याच्या दुसर्‍या मनाने  त्याला झिडकारले . 


विचारांच्या हिंदोळ्यावर झुलत झुलत तो भराभर  कामे आटोपून मोकळा झाला. घड्याळाचा काटा पावणे नऊ वर स्थिरावला होता.


लगेचच खानावळवालीचा डब्बा त्याने स्वच्छ घासला आणि पिशवीत भरता भरता  त्याला कालचा संवाद आठवला . त्या मुलीचा चेहराही त्याच्या डोळ्या समोर तरळला.   अशाही मुली असतात म्हणजे. 


त्याने मोजून एकशे साठ रुपये  डब्ब्यात ठेवले आणि  पिशवी घेऊन तो अंगणाच्या दाराशी जाऊन उभा राहिला .  का कोण जाणे ती मुलगी बाबांच्या नजरेला पडावी आणि त्यांचे नकारात्मक बोलणे आपल्याला ऐकावे लागू नये यासाठी त्याची धडपड  चालू होती .


दाराशी उभा राहून येणार्‍या जाणार्‍या वर्दळीकडे  पहात होता . अचानक त्याच्या समोर  एक सायकल थांबली . आणि त्यावरून कालची ती बालिका उतरली .  


"दादा , ताईला वेळ नव्हता म्हणून मीच आली डब्बा आणि पैसे घ्यायला . माझ्यामुळे तुम्हाला उशीर नाही ना झाला ?"


रमाकांतने हळूच घड्याळ पाहिले , बरोब्बर नऊ वाजले होते.   नकारात्मक मान हालवत तो म्हणाला , " नाही तू एकदम वेळेत आलीस. हा तुझा डब्बा.   पैसे डब्ब्यातच ठेवले आहे . तेही बरोब्बर मोजून एकशे साठ. " 


"दादा,  तुम्हाला कालचे जेवण आवडले का ?"


"हो, हो , एकदम उत्तम होते.  का ग , तुझ्या ताईने विचारले का ?"


"छे छे, तिला अजिबात वेळ नसतो .  काल खूप उशीर झाला होता आणि  मला अंधाराची भीती वाटते ना म्हणून ती माझ्याबरोबर आली होती. 


आई सगळा स्वयंपाक करते आणि  मी डब्बे पोहोचवून देण्याचे काम करते . 


ताईला खूप अभ्यास असतो ना म्हणून आई तिला सध्या ह्या कामात अडकवत नाही . चला  मी निघते , माझीही शाळा आहे .  पुन्हा केंव्हाही डब्बा  लागला की फोन करा . बाय म्हणत ती दिसेनाशी झाली सुद्धा. "


रमाकांत ने घड्याळ पाहिली , त्याचीही निघण्याची वेळ झाली होती .  घरात येऊन त्याने आपली बॅग उचलली,  बाबांना सांगून त्याने दाराला कुलूप घातले आणि झपाझप बँकेच्या दिशेने चालू लागला .  


बँकेच्या दारातच स्मिता गोडबोले ने त्याला गाठले आणि लालभडक लिपस्टिकने रंगवलेल्या ओठांचा चंबू करत ती त्याला म्हणाली , " गुडमॉर्निंग  सर...


तिच्याकडे सपशेल दुर्लक्ष करत  त्याने मस्टर वर सही केली आणि आपल्या खुर्चीकडे वळला.


उगीचच मनातल्या मनात त्याने स्मिता गोडबोले आणि कालच्या मुलीची तुलना केली . 


आणि मग आपण असे का करतोय हे त्यालाच समजेना . आपल्याला तर साधे तिचे नावही माहिती नाही .


काय असेल तिचे नाव ? .....


पाहूया पुढच्या भागात ...


...............      ........      ........           क्रमशः 


🧚‍♂️🏃🧚‍♂️🏃🧚‍♂️🏃🧚‍♂️🏃🧚‍♂️🏃🧚‍♂️🏃🧚‍♂️🏃


©️®️सौ. मंजूषा श्रीकांत अपराजित 



Wednesday, 12 July 2023

आई नसलेले घर : पर्व १ : भाग १

सुमतीला जाऊन १५ दिवस झाले होते.  पण येणाऱ्यांची संख्या काही कमी होत नव्हती .  सगळ्यांची उस्तवार करता करता तिची मुलगी पूर्वा थकून जात होती.  

तिची मोठी बहीण अपूर्वा  अमेरिकेत होती.  त्यात तिची नुकतीच म्हणजे आई जायच्या आदल्या दिवशीच डिलिव्हरी झाली होती.   आईचे शेवटचे दर्शनही तिला घेता आले नव्हते.  तिला दुसरा मुलगा झाल्याचे आईने ऐकले आणि त्यानंतर पाचच मिनिटातच तिने डोळे मिटले होते.

ना आई आजारी होती ना अंथरूणावर झोपून होती .

नेहमीप्रमाणेच सकाळची सगळी काम तिने आटोपली होती. 

काल संध्याकाळीच अपूर्वाचा फोन आला होता की  ती  अ‍ॅडमिट होतेय.  तिच्या मुलीला सांभाळायला सासू सासरे आलेत. त्यामुळे काळजी करू नको.

.........................................................
चला जरा पूर्वेतिहास पाहू या ...

अपूर्वा,  पूर्वा ,बाबा रमाकांत , आई सुमती  आणि शेंडेफळ अपूर्व असे ते  देशमुखांचे कुटुंब . 

रमाकांत अत्यंत कर्मठ.  तेव्हढाच प्रामाणिक, कष्टाळू.  पण घरात वावरताना आपल्या मतांबाबत अति आग्रही असणारा . 

घराबाहेर प्रत्येकाशी गोड बोलणारा . प्रत्येकाच्या अडचणी समजून घेऊन त्याप्रमाणे वागणारा, त्यांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करणारा . 

त्यामुळे  बाहेर त्याची ख्याती एक अत्यंत सुस्वभावी,  गुणी माणूस अशीच होती .

घरात शिरता शिरता रमाकांतचा  हा मुखवटा  गळून पडत असे . मुळात स्त्री विषयी मनात घृणा  असलेला हा मनुष्य.  कारणही जबरदस्त.  

ह्याच्या जन्मानंतर आईने, वडीलांच्या त्रासाला कंटाळून कोणालाही न सांगता गृहत्याग केला.  ती माहेरी ही  नाही  गेली .   पुढे तिचा कधीही पत्ता लागला नाही .

लोक प्रवादाला घाबरून वडीलांनी चक्क तिला चारित्र्यहीन ठरविले आणि मोठ्या होत चाललेल्या मुलाच्या मनात ही तेच विष कालवत गेले. 

एकदाच तो आईच्या आठवणीने  खूप रडला होता. त्या दिवशी त्याच्या बाबांनी त्याला खूप बदडून काढले होते.  ह्या घरात तिचे पुन्हा  नाव काढायचे नाही म्हणून त्याला तंबी दिली होती. तसेच बाहेर कोणालाही आपले दुःख  दिसले नाही पाहिजे ही जरबही दिली होती . त्यामुळे घराबाहेर हसतमुखाने राहायचे आणि घरात शिरल्यावर  राग राग व्यक्त करायचा , हा त्याचा स्वभावधर्म  झाला होता .

लहान असताना  आईविना पोर म्हणून आजूबाजूचे  सहानुभूती दाखवत ती त्याला असह्य होत असे.

कधी मित्रांच्या आईने हातावर खाऊ ठेवला की तो त्याला नकोसा होत असे .

असे प्रसंग घडले की तो घरी येऊन आदळआपट करीत असे. 

मनात कटू भावना ठेवत रमाकांत लहानाचा मोठा झाला.  समस्त स्त्री जाती विषयी मनात तुच्छतेची भावना सरत्या काळाबरोबर वाढतच गेली.

शिक्षण आटोपले . बँकेत लगेचच नोकरी लागली.  आता वडील ही म्हातारे झाले होते.  जो पर्यंत त्यांना झेपत होते तोवर ते स्वतः घरातील कामे करत. स्वयंपाकाला सुद्धा त्यांनी बाई ठेवली नव्हती.

पण अलीकडे त्यांना सर्व कामे जमत नव्हती .  रमाकांत ती कामं करून घेत होता पण त्यामुळे त्याची तारेवरची कसरत होत होती.  

त्यातच एक दिवस वडील पडले आणि त्यांनी अंथरूण धरले .  रमाकांतची अजूनच ओढाताण होऊ लागली .  वडिलांची सेवा , त्यांचे औषधपाणी , त्यांचे पथ्य,  घरातली सगळी कामं  आणि हे सगळे आटोपून  वेळेत बँक गाठायची.

प्रमोशन ड्यु असल्यामुळे सुट्टीही घेणे शक्य नव्हते. 

थकून भागून घरी आल्यावर पुन्हा  कामांची यादी तयारच असायची .  जोडीला दिवसभर घरात एकटेच राहावे लागल्यामुळे बाबांची कुरकुर चालूच रहायची.  

तरी बरे घर आणि बँक वॉकिंग डिस्टंस वर  होते.  लंच ब्रेक मध्ये रमाकांत घरी येऊन बाबांना हवे नको  पाहून जात असे .  ते नीट जेवले की नाही ह्याकडेही  त्याचे बारीक लक्ष असे.

त्याच्या बँकेतल्या एका सहकार्‍याला त्याची अडचण कळली .  त्याने  त्याला एका घरगुती खानावळीचा पत्ता दिला.  त्या खानावळ चालवणार्‍या काकू घरपोच डब्बे ही देतात असेही सांगितले .

पण रमाकांतने सुरवातीला तिकडे दुर्लक्ष केले.  कारण बाबा फार कटकट करतील ह्याची त्याला पूर्ण कल्पना होती .  पण थोड्या दिवसातच तो ह्या सगळ्या  गोष्टीना कंटाळून गेला .

एक दिवस बँकेत भरपूर काम पुरले त्याला.  सगळे आटोपून घरी पोहोचायला त्याला जवळपास आठ वाजणार होते .   गेल्यावर पुन्हा स्वयंपाक करणे त्याच्या जिवावर आले .  

त्याच्या सहकार्‍याने दिलेल्या खानावळीचा फोन नंबर त्याने फिरवला आणि दोघांच्या साठी घरपोच डब्बा साडे आठ वाजेपर्यंत पोहोचवायला सांगितला .

खानावळीचा पत्ता विचारताना त्याच्या लक्षात आले की खानावळ त्याच्या घराच्या मागच्याच आळीत आहे.  

त्याने विचार केला ,आज खाऊन तर पाहूया .  आवडले तर परत मागवता येईल .  तसाही आपल्याला फारसा स्वयंपाक करणे जमत ही नाही  आणि आवडतही नाही.

तेवढ्यातच प्यूनने  येऊन सांगितले की साहेबांनी बोलावले आहे.  मनातला विचार झटकत तो साहेबांच्या  केबिन मध्ये शिरला.

मे आय कम इन ,सर ? 

या या देशमुख , बसा.  फाईल मधले  डोके वर न करता जोशी साहेबानी त्याला खुर्चीवर बसायचा संकेत दिला .

पाच मिनिटे केबिन मध्ये शांतता होती.  काम होताच जोशी साहेब  रमाकांतला म्हणाले ,  "अभिनंदन , तुमचे .  तुमचे प्रमोशन झालेय.   क्लास वन ऑफिसर झालात आता तुम्ही .  

तुमची बदली  शिवाजीनगर ब्रँचला झालीय.   आठ दिवसात तुम्हाला  तिथे जॉईन व्हायचे आहे . "

प्रमोशनच्या  नावाने हसरा झालेला रमाकांतचा  चेहरा बदलीच्या नावाने खाडकन उतरला.

शिवाजी नगर ब्रँच म्हणजे घरापासून तासभराच्या अंतरावर. दहा वाजता ऑफिस गाठायचे म्हणजे  नऊ वाजताच घर सोडावे लागणार .  त्याआधी घरची सगळी काम आटोपून , बाबांची आंघोळ , नाश्ता,  औषधपाणि ,  बापरे  चांगलीच धावपळ होणार .

काय झाले देशमुख ?  आनंद नाही झाला का तुम्हाला ?

भानावर येत रमाकांत म्हणाला , " असे नाही सर,  आनंद तर झालाय , फक्त बाबांचा विचार मनात आला म्हणून थोडा विचारात पडलो "

"देशमुख ,  आता  पटकन लग्न करून टाका. म्हणजे तुमची बाबांविषयीची काळजी दूर होईल .  घरी हक्काचे माणूस राहील .  चवीढवीचे  खायला मिळेल .  आता पगारवाढ ही झालीय म्हणजे कोणीही डोळे झाकून मुलगी देईल ."  ज्येष्ठत्वाच्या  नात्याने जोशी सरांनी हसत हसत सल्ला दिला. 

रमाकांतने फक्त चेहरा हसरा केला  आणि म्हणाला, " सर येऊ आता ."

हो, हो  अवश्य  . पुनश्च एकदा अभिनंदन.  

जोशी सरांच्या केबिन बाहेर येताच त्याचे सहकारी त्याच्या भोवती जमा झाले आणि त्यांनी त्याच्या वर अभिनंदनाचा वर्षाव केला . 

प्रत्येकाचे अभिनंदन स्विकारत तो आपल्या खुर्चीकडे निघाला तोच स्त्री वर्गाने त्याला गराडा  घातला.

कधीही कोणाही स्त्रीला हाय हॅलो न म्हणणारा रमाकांत गडबडून गेला . 

साधारण त्याच्याच वयाची लोन डिपार्टमेंटची सरिता चिवचिवली,  "अभिनन्दन रमाकांत,  पार्टी द्या आता आम्हाला."

पेन्शन डिपार्टमेंटच्या काकू म्हणाल्या , " रमाकांत खूप खूप अभिनंदन . उद्या तुझ्यासाठी बेसनाचे लाडू नक्की घेऊन येईन हा. "

नव्यानेच जॉईन झालेली  स्मिता गोडबोले, गालावर खळी पाडत , लाजत लाजत शेकहँड साठी हात पुढे करत म्हणाली , " सर,  अभिनंदन".

बावचळून गेलेला रमाकांतला काय करावे ते समजेना . कसेबसे हात जोडून त्यांना धन्यवाद म्हणत आपली सुटका कशी करावी ह्याचा विचार तो करत होता .

त्यांचे प्रश्न त्याच्या कानापर्यंत पोहोचतच नव्हते.
त्यांना धड उत्तर ही देऊ  शकत नव्हता .  त्याच्या स्वभावाची पूर्ण कल्पना असलेला प्यून दुरूनच त्याची गम्मत पहात होता.

शेवटी त्याची दया येऊन तो चहा घेऊन आला आणि म्हणाला , "अग तायानों, आपले रमाकांत दादा भारी आहेत बर. त्यांनी मला मघाशीच तुम्हाला सगळ्यांना चा-बिस्किट त्यांच्याकडून द्यायला सांगितले. "

अगबाई हो का ? म्हणत सारा स्त्री वर्ग आता प्यूनच्या  दिशेने झेपावला आणि रमाकांतची सुटका झाली .

खर म्हणजे त्याला प्यूनचा  त्यानी केलेल्या आगाऊपणा बद्दल  खूप राग आला होता .  पण आपल्या सुटकेसाठी त्याने ही युक्ती केली हेही त्याला जाणवले. 

म्हणून वरून हसत हसत पण मनातून चडफडत त्याने सगळ्यांच्या चहा बिस्किटाचे पैसे प्यूनच्या स्वाधीन केले.  आणि तो आपल्यासाठी कामात दंग झाला.

आठ दिवसात इथले काम संपवायची जबाबदारी त्याची होती आणि कामाच्या बाबतीत तो अत्यंत चोख होता.  त्यामुळे त्याचे हात भराभर कामे उरकू लागले .

कामाच्या गडबडीत तो तहान, भूक , घर, बाबा, खानावळीचा डब्बा सगळेच विसरला.  आठ वाजले तसे प्यून त्याच्या आजूबाजूला घुटमळत उभा राहिला. पण त्याला काही फरकच पडत नव्हता.

त्यामुळे शेवटी त्याला आवाज दिला , " रमाकांत सर,  घरी बाबा तुमची वाट पाहत असतील ...."

रमाकांतने घड्याळ पाहिले आणि हडबडून उठत भराभर आपला टेबल आवरून तो घराकडे निघाला सुद्धा. 

चला पाहूया घरापाशी पोहोचता पोहोचता काय काय घडते . पुढच्या भागात पुन्हा भेटू ..

क्रमशः .😀😀

©️®️सौ. मंजूषा श्रीकांत अपराजित 


Friday, 16 September 2022

स्त्री भ्रूणहत्या (शंकरपाळी काव्य)

 👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦


                    ए

                  आई

                बाबांना 

              थांबव ना 

            भ्रूणहत्या हे 

          पाप आहे सांग

         मी तुझी सानुली

          त्यांची सावली 

             नाव मोठे

               करीन 

                सांग

                  तू 


                 मी 

                तुझी 

               मुलगी 

             आहे जरी 

            सांभाळ तुम्हा 

           दोघांचा करीन 

            पैसा कमविन 

              सुख देईन

              माझ्यातर्फे 

                तुम्हास 

                 जाण 

                   गे



©️®️सौ मंजूषा श्रीकांत अपराजित



Tuesday, 6 September 2022

कलाकार मी त्याच्या रंगमंचावरचा

 (मुक्तछंद)


कलाकार मी त्याच्या रंगमंचावरचा ,

वेळेची  किल्ली भरून पाठवलेला , 

किल्ली संपेस्तोवर नाचणारा,

कुणाला हसवणारा,  कुणाला रडवणारा .


तीन अंकी नाटकाचा नायक ही मीच ,

खलनायक ही मीच,  

नायक खलनायकाची लढाई लढणारा, 

कुणाला हसवणारा,  कुणाला रडवणारा.


पहिल्या अंकाची सुरवात होते माझ्या रडण्याने, 

आणि हर्षभरीत प्रेक्षकांच्या आनंदाने. 

अंक संपता संपता आनंदाची जागा चिंतेने व्यापायला लावणारा,

कुणाला हसवणारा,  कुणाला रडवणारा.


पहिल्या अंकाचा शेवट असेल सुखद, तर दुसरा अंक असतो मस्त ,

आशा आकांक्षा,  इच्छा पूर्तीचा.

नसेल तसा तर तरुणपणीच  वार्धक्याला बोलावणारा,

कुणाला हसवणारा,  कुणाला रडवणारा.


तिसरा अंक सगळ्यात मोठा , सुख दुःखाने भारलेला ,

केलेल्या सत्कृत्याचे गोड फळ देणारा, दुष्कृत्याचा  जाब विचारणारा.

सुटणार्‍यांचे हात धरू पाहणारा,  धरलेल्या हातानी सहजपणे  लाथाडलेला,

येतानाही रडलेला , जातानाही रडणारा , हास्य विसरलेला,  

कलाकार मी त्याच्या रंगमंचावरचा ,

वेळेची  किल्ली भरून पाठवलेला.


©️®️ सौ मंजूषा श्रीकांत अपराजित. 



Sunday, 14 August 2022

द्वेष : मनाचे एक काटेरी टोक भाग ४

 नवीन बाळ घरात आले आणि घरातील वातावरण  बदलले. वातावरण जरी बदलले तरी स्वभाव कसा बदलणार? फक्त त्या स्वभावाला तात्पुरती मायेची झालर जोडली गेली. 


शंकरही  बदलीच्या गावी एकटा राहून कंटाळला होता.  बारशाच्या निमित्ताने तो सुट्टी घेऊन आला.  मोठ्या धुमधडाक्यात बारसे आटोपून तो बायको मुलासह आपल्या गावी परतला. 


पुन्हा एकदा वाड्यात पुरुषी साम्राज्य सुरू झाले.   जो तो आपापल्या कामात गुंतून गेला . 


तात्या क्लासेस, कोर्ट , शेती ह्यात रमून गेले .  शंकरच्या लग्नाचा भपका पाहिल्यावर नातेवाइकांना तात्याच्या अस्तित्वाची नव्याने जाणीव झाली होती . नातेवाईक, येणारा-जाणारा, पै पाहुण्याने घर गजबजू लागले. 


इंद्रा आपल्या नोकरी , कॉलेज , मित्र, अभ्यासात गुंग झाला. लाॅच्या  अभ्यासात त्याला गोडी निर्माण झाली आणि त्यानी भरारी घेण्यास सुरवात केली. ग्रॅज्युएशन,  पोस्टग्रॅज्युएशन ह्या पायर्‍या तो भराभर यशस्वीपणे चढला. पोस्टग्रॅज्युएशनला तर तो पहिला आला . 


ह्याच बरोबर तो गर्वाने सुद्धा फुगू लागला.  सामाजिक संपर्क वाढला . मोठ्या मोठ्या वकील आणि जजशी ओळखी वाढल्या.  अर्थात हे सर्व प्राप्त करण्यामागे त्याची प्रचंड मेहनत होती हे नाकारून चालणारच नाही.


तात्यांनाही  त्याच्यातील बदल जाणवला. त्याचबरोबर त्यांच्या हेही लक्षात आले की आपल्या कोर्ट कचेरीच्या कामा साठी उत्तम प्यादे आहे .  इंद्राच्या मग्रूर स्वभावाला ते नकळतपणे खत पाणी घालू लागले. 


चलाख इंद्राच्याही लक्षात ही गोष्ट आली. तात्यांना खुष ठेवले तर ते आपल्यावर मेहेरबान असतात हे त्याच्या लक्षात आले.  


आता त्याने पूर्वीच्या नोकरीला  रामराम ठोकला आणि त्याने कॉलेज मध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी स्विकारली .  उंचपुरा , टापटीप राहणारा , तरुण आणि सगळ्यात मुख्य विषय सुलभतेने समजावून सांगणारा शिक्षक ह्या गुणां मुळे तो विद्यार्थ्यांचा आवडता शिक्षक बनला. 


नोकरी होती , नाव , प्रतिष्ठा  मिळत होती. भरीस भर म्हणून आता इंद्राने पी.एचडी. चा फॉर्म भरला होता आणि त्यासाठी तो जीव ओतून अभ्यास करत होता. 


ह्या सगळ्याबरोबर वय ही वाढत होते. इंद्र लग्नाच्या वयात येऊन पोहोचला होता. मुलीही सांगून येत होत्या . स्वकर्तृत्वावर मोठा झालेल्या इंद्राच्या अपेक्षा ही वाढल्या होत्या . 


त्याला सुंदर, सुशिक्षित , कमावती बायको हवी होती. अपेक्षेत बसणारी बायको मिळेपर्यंत थांबायची त्याची तयारी होती . तोपर्यंत पीएचडी चा अभ्यास होताच मन गुंतवायला. 


इकडे विष्णुने नवीन व्यवसाय सुरू केला. भांडवलासाठी कर्ज काढले, व्यवसायाची अधिकृत नोंदणी केली. काही पैसे कमी पडत होते. ते त्याने तात्यांना मागितले . तात्या ही कबूल झाले. पण ऐन वेळी पैसे भरायची वेळ आली तेंव्हा तात्यांनी माघार घेतली.  पूर्णत्वाला आलेले काम अर्ध्यातून सोडायची वेळ आली .


विष्णुला सर्व गाशा नाईलाजाने गुंडाळावा लागला .

डोक्यावर कर्जाचा बोजा होता. काय करावे , काय करावे ह्या विचाराने डोक्याचा भुगा व्हायची वेळ आली . 


नातेवाईकांच्या नजरा तीक्ष्ण झाल्या.  समारंभ , उत्सव अशा प्रसंगी एकतर त्याला निमंत्रण नसे किंवा बोलवले तरी तो दुर्लक्षित रहात असे.  


अशा वेळी विष्णुला तात्या आणि इंद्रा कडून आधार मिळावा अशी माफक अपेक्षा असे . पण 

ते दोघे ही इतर आप्तेष्टां प्रमाणे त्याची खिल्ली उडवत असे.


वैतागलेल्या विष्णु समोर तात्यांनी दोन पर्याय ठेवले.  एक तर शेती कर किंवा त्यांच्या क्लासेस मध्ये जॉईन हो.  


कर्ज फेडण्यासाठी काहीना काही करणे भाग होते .    मनावरची मरगळ झटकून विष्णुने क्लासेस घेण्याचे ठरविले .   ग्रॅज्युएशन नंतर बांधून ठेवलेला  पुस्तकांचा बस्ता त्याने पुन्हा उघडला.   आणि मेहनत करायला सिद्ध झाला. 


एका विद्यार्थ्यापासून  सुरू केलेला शिकवणी वर्ग नावारूपास येऊ लागला .   थोडक्या काळात विष्णुने नाव कमावले.   कमी फी, जीव तोडून शिकवणे , अगदी कमकुवत विद्यार्थ्यांना सुद्धा समजेल इतक्या सोप्या पद्धतीने शिकविण्याची हातोटी ह्या सगळ्या गुणामुळे विष्णुची कीर्ती  दूरवर पसरत होती.


पहिल्या व्यवसायात अपयश  आल्यामुळे. विष्णु सावध झाला होता. कर्जाचा डोंगर त्याला घाईने संपवायचा होता.  फी मिळाली रे मिळाली की तो त्या दिवशीच्या दिवशी कर्जदाराला पैसे देऊन येत असे.  कर्ज फिटे पर्यंत त्याने ना नवीन कपडे घेतले ना नवीन चप्पल. अत्यंत प्रामाणिकपणे  त्याची अखंड मेहनत चालू होती .  हळूहळू त्याने आपल्यावरील सर्व कर्ज फेडले.   विष्णु ही मार्गी लागला.


इंद्राला मुली  सांगून येतच  होत्या़. आणि तो मनाजोगी मुलगी मिळायची वाट पहात होता . आणि त्याची इच्छा लवकरच पूर्ण झाली. त्याच्याच कॉलेज मध्ये शिकविणाऱ्या मंजिरी सातपुतेचे स्थळ चालून आले . टपोऱ्या डोळ्याची,  गौर वर्णाची , स्थूलतेकडे  झुकणारी मंजिरी त्याला भावली.  त्याच्या पुढे थोडी स्थूल जरी वाटत होती तरी बाकी गोष्टींचा विचार करता त्याने त्या स्थळाला होकार दिला . होकार देण्याचे दुसरे कारण असे की तिचा चुलत भाऊ सुप्रीम कोर्टात जज होता. पुढे मागे त्याला ह्या गोष्टीचा फायदाच होणार होता.


आई , वडील , मंजिरी आणि माधुरी असे छोटे चौकोनी कुटुंब . वडील मोठ्या हुद्द्यावर होते. पदरी माया भरपूर जमवली होती .  माधुरी आणि मंजिरी रुपाच्या बाबतीत दोन टोक होती.  मंजिरी रूपवती तर माधुरी ठेंगणी , लठ्ठ,  दात पुढे , फेन्द्र्या नाकाची.  नुकतीच एमेस्सी झालेली . वडीलांना तिच्या लग्नाचा घोर होता.  मंजिरीचे हात पिवळे झाले की लगोलग तिच्या लग्नाचे पहायचे त्यांनी ठरवून टाकले होते. 


जेंव्हा इंद्राने मंजिरीला होकार कळविला तसे तिचे वडील फारच खुष झाले . एव्हढा मोठा वाडा , राहणारे तिघेच , आपली पोरगी राज्य करेल.  त्यांच्या स्वप्नांना पंख फुटू लागले होते .  


धुमधडाक्यात लग्न झाले .  मंजिरी  माप ओलांडून इंद्राच्या घरी आली.  


चला पाहूया इंद्राचे, विष्णुचे आयुष्य आता कसे वळण घेते. ..........


                                          क्रमशः 


©️®️सौ मंजूषा श्रीकांत अपराजित 


$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$

ह्या कथेशी जर कोणालाही स्वतः च्या  वा जवळच्या कुणाच्याही आयुष्याशी साधर्म्य  आढळले तर  तो योगायोग समजावा .



Wednesday, 10 August 2022

द्वेष:मनाचे एक काटेरी टोक भाग ३

 शंकर इंजिनियर  झाला, नोकरीला लागला . नोकरी निमित्ताने त्याची वेगवेगळया गावात, शहरात बदली होत असे.  आधी शिक्षणामुळे आणि आता नोकरीमुळे सतत बाहेर राहण्याची सवय झाली त्याला. घराविषयी,  वाड्या विषयीची ओढ कमी होऊ लागली .  


आता शंकरच्या लग्नासाठी प्रस्ताव येऊ लागले होते. वाडा पुन्हा सुखाच्या पावलांसाठी आसुसला.


तात्यांच्या  ही शिलकीत वाढ होत होतीच . बायकोसाठी केलेले दागिने त्यांनी पुन्हा उजळवून घेतले.  जणू नव्या सुनेच्या आगमनाचे वेध त्यांनाही लागले  हेच त्यांनी सूचित केले होते .


शंकरची प्रगती पाहता त्याला बर्‍याच मोठ्या घरातील मुली सांगून येत होत्या.  अशाच एका मोठ्या (आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या) कुटुंबातील मुलगी सुमती शंकरच्या पसंतीस उतरली. 


बोलणी करण्याच्या आधी तात्यांनी इंद्र आणि विष्णुशी संवाद  साधला .  बड्या घरची बेटी सून म्हणून येणार ह्या विचारानी तात्यांना लोभ सुटला होता . हुंडा मागायचा असे आपले मनोगत त्यांनी सांगताच विष्णु रागावला. हुंड्याचा विरोधात त्याने आपले परखड मत व्यक्त केले . जर हुंडा मागितला तर मी घर सोडून जाईन अशी धमकीही त्याने दिली.  त्यामुळे तात्यांचा नाईलाज झाला. हुंड्याचा विचार त्यांनी बारगळला. 


पण ह्या प्रसंगाने तात्या नाराज झाले. विष्णु विषयी त्यांच्या मनात एक अढी निर्माण झाली . विष्णुच्या  खडतर प्रवासाची सुरवात इथून सुरू झाली हे विष्णुच्या  गावी ही नव्हते .


उलट तात्यांनी आपले ऐकले  म्हणून विष्णु अत्यंत खुशीत होता.


शंकरचे लग्न ठरले.  उदासलेला वाडा मरगळ झटकून तरतरीत झाला .


मोठ्या उत्साहाने विष्णु आणि मित्रमंडळी कामाला लागली . बोलणी , देणेघेणे , साखरपुडा ,  लग्न सगळे सुरळीत पार पडले .


कु.सुमती बाळकृष्ण गोखलेची  सौ. सुमती शंकर अजिंक्य झाली .  


चार भावांची एकुलती एक लाडाची बहीण अजिंक्यंच्या घरात गृह स्वामिनी म्हणून प्रवेश करती झाली.


नव्याचे नऊ  दिवस सरता सरता तिला एकेकाच्या स्वभावाची ओळख होऊ लागली होती.  वडीलांनी लग्नात कोणाच्याही मानापानात  कमतरता ठेवली नव्हती  तरी तात्या जरा फटकून वागतात हे तिला जाणवू लागले होते .


इंद्रा तसा ठीकठाक वागत होता पण कुठे तरी त्याच्या वागण्यात अहंभाव आहे असे वाटत असे . 


धाकटा विष्णु आईच्या मायेला दुरावलेला असल्यामुळे वहिनींच्यात आई शोधत होता. जमेल ती मदत वहिनीला करत होता.  तात्यांच्या वाकड्या वागण्या पासून वहिनीला वाचवत होता.


तरी पण कधी कधी कटू प्रसंग उद्भवतच होते .  तात्यांना  नवी नवरी वगैरेशी काही देणे घेणे नव्हते. मी म्हणेन ती पूर्व दिशा. माझ्या वेळा सांभाळा. जर एखाद दिवशी काही कारणाने थोडाही उशीर झाला तर तात्या त्या दिवशी रागारागाने आपला स्वयंपाक करून घेत . तेवढ्यात जर सुमती येऊन पोहोचली आणि तिने करून देते म्हंटले तरी ते मग तिच्या हातचे खात नसत.


कधी ह्या गोष्टी शंकरच्या कानावर गेल्या की मग तात्यांचे आणि शंकरचे खटके उडत. 


तसेही सुमती मोठ्या घरातून आलेली, तिच्या  घरी खाण्यापिण्याची  ददात  नव्हती, तर तात्याचा स्वभाव सगळे काही मोजून मापून करण्याचा.  येवढे धान्य इतके दिवस पुरलेच पाहीजे हा त्यांचा दंडक असे.  


सुमतीला मात्र स्वयंपाकाची , निरनिराळे पदार्थ करुन खाऊ घालण्याची हौस.  घरातील सामान संपले की ती तात्यांना सांगत असे . त्यामुळे तात्यांची फार चिडचिड होई. अजूनही घरातले खर्च त्यांना भागवावे लागतात याचा त्यांना राग येई. 


शंकरचा पगार फार काही जास्त नव्हता त्यामुळे घरातील खर्चात त्याचा अजिबात हातभार नव्हता.


इंद्र चलाख होता तो नोकरीला लागला होता पण त्याचा एक मित्र आणि तो बाहेरच्या बाहेर खाणे पिणे,  मौज मजा ह्यात पैसा खर्च करत असे . तसेच त्याला कपड्यांचा अति शौक होता.  ह्या सर्वासाठी लागणारा पैसा तो जमवून ठेवत असे. तशातच त्याने लाॅ कॉलेजला अ‍ॅडमिशन घेतली होती. त्याच्या डोक्याने वकील  होण्याचे ठरविले होते .   कॉलेजच्या फीचे पैसेही तो तात्या कडून उकळत असे .


विष्णु पैसे कमावण्यासाठी धडपडत होता. पण त्याला सूर गवसत नव्हता . त्याला नोकरी ऐवजी व्यवसाय करण्याची इच्छा होती .


आणि  पुन्हा एकदा एक आनंदाची लहर वाड्यात पसरली.  शंकर आणि सुमती च्या संसारात नव्या पाहुण्याने येण्याची वर्दी दिली .


शंकरची  बदली झाली आणि तो बायकोला वाड्यात ठेवून बदलीच्या गावी निघून गेला. घरात कोणी बाई माणूस नसल्यामुळे सुमतीच्या  माहेरच्या फेर्‍या वाढल्या . कधी कधी तिचे आई वडील  येऊन राहू लागले . 


तात्यांना ते फार मान देत त्यामुळे तात्या आपण किती छान आहोत हे दाखविण्याचे नाटकं करत.


यथोचित समयी सुमतीने मुलाला जन्म दिला. सर्वत्र आनंदीआनंद झाला.  


काय ह्या नातवाच्या आगमनाने तात्यांच्या कडवटपणा स्वभावात  फरक पडला ? इंद्राची प्रतिक्रिया काय होती ?  


चला पाहूया पुढच्या भागात ...


                                             क्रमशः 



©️®️सौ मंजूषा श्रीकांत अपराजित 

################################## 

✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️


वाचक वर्ग तुमच्या समीक्षे च्या प्रतिक्षेत 

 

ह्या कथेशी जर कोणालाही स्वतः च्या वा जवळच्या कुणाच्याही आयुष्याशी साधर्म्य आढळले तर तो योगायोग समजावा . 


Welcome

संस्कारित नारायणी : सौ. ललिताशास्त्री विनायकशास्त्री आर्वीकर

 ती माणसच निराळी असतात , पूर असतो त्यांच्या स्वभावात,  किनारा सोडतात तेंव्हा नदीहून बेफाम होतात , कोसळतात खोल तेंव्हा किती उंच जातात . हृदय ...