Monday, 28 March 2022

कातरवेळ आणि अजून काही

🌇 कातरवेळ 🌇

ती कातर वेळा अजुनी स्मरते मजला ,
तो रवी क्षितिजा स्पर्शित झाला होता .
तो चंद्र हासरा नभात विहरत  होता ,
दिवा तमाचा  खेळ मनोहर ,
हृदया रमवित होता .
ती कातर .....
दर्याची ती गाज साथीला ,
खगे शोधीती आश्रय तरुचा,
पशू धन ते परते घरला.
भासे मजला कृष्ण सावळा ,
मुरली घुमवत आला ,
ती कातर......
अशा समयी त्या  दृष्य आगळे ,
पाहून मी ही स्तंभित झाले.
बाल मूर्ती ती कटि घेऊनी ,
ममतामयी ती त्यास जोजवी.
तेज तिच्या त्या मुख कमलाचे
रवी शशीला  हरवित होते .
ती कातर ...

©® सौ. मंजूषा श्रीकांत अपराजित

💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦

🌇 कातरवेळ - २ 🌇

कातरवेळी का गे सजणी ,
भरले तुझिया नयनी पाणी .
अस्ताला तो रवी चालला ,
चल गे सखये आता गृहाला.
कपिला आणिक तिचे पाडसे ,
हंबरून तुज साद घालते,
पिंजर्‍या मधूनी राघू - मैना ,
तुझ्या विना गे त्यांची दैना .
उदीत होईल शशी गे आता ,
शांत सागरी उठतील लाटा ,
दुडदुडणारी सान पाऊले,
आसुसलेली तव मायेला.
सखे साजणी सावर आता,
हुरहूर लावी कातरवेळा,
तव प्रेमाची मागत भिक्षा,
अलख् निरंजन जोगी आला.

©️®️ सौ. मंजूषा श्रीकांत अपराजित
💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦

🐥 गान कोकिळा 🐥 

आठवतोय का तुला तो पावसाळी दिवस
गच्च भरलेले आभाळ अन् पाण्यात भिजलेली हिरवळ
हात तुझा हाती ,बेभान झालेले मन ,
कागदी होडीत बसूनच फिरून आलोत सारे जग .
जग ही आपले न्यारेच, नव्हते ह्या जगा परी,
नव्हता स्वार्थ तिथे, नव्हती चिंता उद्याची.
नव्हते कोणते दुःख,  नव्हती कोणती विराणी,
शब्द ,शब्द आणि शब्दच, साथीला तुझी वाणी.
आठवतोय का तुला तो पावसाळी दिवस
गच्च भरलेले आभाळ अन् पाण्यात भिजलेली हिरवळ .

क्षणात घालत होतो आभाळाला गवसणी,
क्षणात डुंबत होतो दर्याच्या खोल तळी.
चांदणे आणि रत्ने मिरवीत होतो सारख्याच भावनेने, 
वृक्षांच्या त्या हळव्या सावल्या , तृप्त कोकिळेच्या कूजनाने.
आठवतोय का तुला तो पावसाळी दिवस
गच्च भरलेले आभाळ अन् पाण्यात भिजलेली हिरवळ .

आजही रमतेय त्याच शब्दांच्या जगात, फिरवून आणतात ते मला क्षणात तिन्ही लोकात ,
अजूनही तरंगते तीच कागदी बोट मनात,  घेऊन जाते ती मला त्याच हिरव्या बनात ,
कोकिळेचे कूजन ही अगदी तसेच आहे , चेहरा मात्र तिचा स्वर्गात गेला आहे .
आठवतोय का तुला तो पावसाळी दिवस
गच्च भरलेले आभाळ अन् पाण्यात भिजलेली हिरवळ .

©️®️ सौ मंजूषा श्रीकांत अपराजित
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

पयोधी तो शांत होता..

रात्र ती नि:शब्द होती ,
द्वितीयेच्या  चंद्रमाची.
भारलेल्या तारका त्या ,
पयोधी तो शांत होता.

दूर त्या दुसर्‍या किनारी ,
आर्तता खुणवीत होती,
वेणूच्या त्या आर्त नादी ,
मी स्वतःला शोधीत होती .

कोण मी ? कोण मी ?
सागरा तू सांग रे,
ऐकुनी प्रश्नास माझ्या ,
तू कसा शांत रे ?

हारले एकदा मी पुन्हा रे,
शोधता  मज त्या किनारी,
हरवले मी पुन्हा रे,
शांतशा त्या  सागरी .

©️®️ सौ मंजूषा श्रीकांत अपराजित

💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧

प्रतिभेला प्रतिभेची 
जाणीव असावी 
सोन्याच्या कोंदणाने
हिरकणी अलगद उचलून घ्यावी 

©️®️सौ. मंजूषा श्रीकांत अपराजित
🟣🔷️🟣🔷️🟣🔷️🟣🔷️🟣🔷️🟣🔷️🟣🔷️🟣🔷️

भास आभासाचा हिंदोळा ,
खुणावतो तो आजही मजला .
येशील कारे सखया कृष्णा ,
वाट पाहते वेडी राधा .

©️®️ सौ मंजूषा श्रीकांत अपराजित 
🟧🟩🟧🟩🟧🟩🟧🟩🟧🟩🟧🟩🟧🟩🟧🟩

चंद्र सावळ्या नभी उगवला
पवन शीतल मंद भासला
वनी केवडा फुलून आला
बंसीतून  तो कृष्ण ही वदला
वृथा सारे सखये तुज वीण
का फिरते तू होऊन विरहीण

©️®️ सौ मंजूषा श्रीकांत अपराजित
🔺️🔻🔺️🔻🔺️🔻🔺️🔻🔺️🔻🔺️🔻🔺️🔻🔺️🔻

सहस्र रश्मी पसरून जगभर 
जीवन देई तो धरणी वर 
नसे दुजा त्या रवी राजा सम
नसे विसावा त्याला क्षणभर

©️®️ सौ मंजूषा श्रीकांत अपराजित
🔆🔅🔆🔅🔆🔅🔆🔅🔆🔅🔆🔅🔆🔅🔆🔅

Wednesday, 9 March 2022

समिक्षण : उपक्रम ज्ञानदेवीचा-सहभाग माझा

 ज्ञानाने म्हणजेच ज्ञानदेवीने  एक सुंदर उपक्रम राबवला . प्रत्येकाने आपण वाचलेल्या कोणत्याही कथा,कादंबरी वा कवितेवर समीक्षा द्यायची. एकदा समीक्षा द्यायची ठरविल्यावर डोळ्यासमोर मोठ्या मोठ्या दिग्गजांची नावे डोळ्यासमोर तरळू लागली.

वि. स. खांडेकर, पु. ल. देशपांडे,  व. पु. काळे,  सुमती क्षेत्रमाडे , पुरंदरे , शांता शेळके , कुसुमाग्रज , कवि अनिल , ग्रेस , पाटणकर ... अरे यादी संपायचे नावच नाही. केव्हढी श्रीमंती ही माय मराठी ची. साहित्याचे प्रकार तरी किती हो . सामाजिक , वैचारिक , संत साहित्य , ऐतिहासिक , पौराणिक, जुने, नवे अबबब ......शेवटी ठरविले अख्ख्या मराठी माणसाला गारुड घालणाऱ्या व. पु. नाच निवडावे.  ठरले.  व. पु. ची माणस हे पुस्तक मी निवडले .हे  पुस्तक निवडण्या मागचे कारण असे की हे पुस्तक वाचल्यानंतर माणस वाचण्याचा मला नादचा लागला असे म्हणावे लागेल.


पुस्तकाचे नाव : व. पु. ची माणसे


सुरवातच फार सुंदर , बहिणाबाईंच्या कवितेने ---


मानसा मानसा, कधी व्हशीन माणूस
लोभा साठी झाला मानसाचा रे कानूस


ह्या पुस्तकात व.पु. नी ५२ माणस वाचलीत हो. त्या सगळ्यांवर समीक्षा लिहायची ठरविली तर ह्या पुस्तका पेक्षा ही मोठी कादंबरी तयार होईल. म्हणून मला  मनापासून खूप आवडलेल्या व्यक्तिचित्रा वरच समीक्षा देतेय.

वांद्र्याहून सुटणार्‍या हार्बर गाडीत ही व्यक्ती म्हणजे आनंद - व. पु.चा मित्र - अनेक वर्षानी भेटलेला . त्यांच्या गप्पांची सुरवात ही कशी सुंदर.

व. पु. - गड्या लग्नाचे आमंत्रण ही दिले नाहीस ?
आनंद - तू रागवण्यातला नाहीस हे मला माहिती     आहे .
आणि ह्यावर व. पु. चे खूप सुरेख मनाला स्पर्श करणारे वाक्य--  आपला मित्र आपल्याला संपूर्ण समजला म्हणजे रागच उरत नाही .

हे वाक्‍य वाचल्यानंतर पुस्तक खाली ठेवणारा निश्चितच करंटा.

तर ही कथा आनंद आणि त्याची बायको ह्या दोन व्यक्तीं भोवती फिरते . 

आनंदचा दिनक्रम असा : पहाटे चारला उठणे,  साडेपाच पर्यंत ध्यानधारणा , आठ वाजता एका ऑफिस मध्ये  पार्ट टाइम जॉब , शाप १०.३० ते ५.३० बँक . पुन्हा सहा ते साडे आठ  दुसर्‍या ऑफिस मध्ये जॉब आणि हे सगळे आटोपून रात्री १०.३० ला बॅक टू पॅव्हेलियन.
मुंबईतल्या चाकरमान्याच्या कष्टाचे मूर्तिमंत वर्णन. 

बर ही धडपड कोणासाठी ? तर वुई साठी . आहे ना मजा! बायकोचे नाव वुई . कसे ठेवले हे नाव ?

व. पु. विचारतात कोणत्या नावाचा हा शॉर्ट फॉर्म?
आनंद चे ही उत्तर जबरदस्त , शॉर्ट फॉर्म नावाचा नाही वृत्तीचा.   Wife मधला if काढून टाकला आणि Wife ची वुई झाली. 

ह्या वुई ची आईही तेव्हडीच कणखर . लग्न ठरे पर्यंत तिला स्वतःच्या मनाने जगू दे , नंतर बेड्या आहेतच, असे  म्हणणारी. तेव्हडीच सामाजिक भान असणारी - तिच्या जिवाला धोका नाही ना एव्हडेच मी बघते असे म्हणणारी.

आणि जुई ? थ्रील शिवाय आयुष्यात मजा नाही असे म्हणणारी . तर ही जुई पायाला सतत भिंगरी लावून फिरणारी , आयुष्य झोकून देऊन जगणारी,  क्रिकेटप्रेमी, नवर्‍याच्या वाटेला अभावानेच येणारी.

पण नवरा अत्यंत संयमी आणि समाधानी . वुईचे बेभानपणे जगणे सहन करण्यासाठी त्या वरच्या शक्ति कडे प्रार्थना करणारा आनंद .

हे सगळे केंव्हा थांबेल?
तर बाळंतपण वाट्याला आले की थांबेल , अगदी तात्काळ उत्तर तयार.
वुई mother केंव्हा होईल ?
तर आनंद अगदी शांतपणे उत्तरतो,  mother मधला other तिला हवासा वाटेल तेंव्हा किंवा वुई ला प्रेग्नन्सी थ्रीलींग वाटेल तेंव्हा . असा समजूतदार नवरा म्हणजे  नवलच.
ह्या व्यक्तीचे थक्क करणारे विचार मोठे की  व. पु. ची लेखन शैली मोठी ? हा एक अनुत्तरीत प्रश्न .

तेव्हडीच मोठी वुई . नवर्‍याला अस म्हणणारी. Husband मधला ban म्हणजे बंदी घालणारा ही अक्षरेच  उडवून लावणारी.
Possession  ऐवजी belonging ला महत्व देऊन अहम् ला विरघळवणारी ही जोडी.
Overtime ला चैतन्याची पूजा म्हणणारा आनंद ग्रेट की नवर्‍याचा स्वातंत्र्य देण्यातला आनंद सांभाळणारी वुई मोठी?

पुन्हा एकदा व. पु. ना वंदन करण्याचा मोह आवरत नाही .
कथेचा शेवट खूप काही सांगणारा :
If we love somebody , set it free. If  it comes back to you, it was yours.  If doesn't,  it was never.

माणस वाचण्याचा नाद लावणार्‍या व. पु. ना त्यांच्याच माणसातून वाचा.
धन्यवाद .

विशेष धन्यवाद dnyandevi wankhde चे.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

©️®️ सौ. मंजूषा श्रीकांत अपराजित 

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

मिळालेल्या काही प्रतिक्रिया 


ज्ञानदेवी वानखडेची प्रतिक्रिया

नागपूर गेट टुगेदर मध्ये लिपी वरील बऱ्याच लेखकांची ओळख झाली...त्यात काही व्यक्तिमत्त्व कायम मनाच्या गाभाऱ्यात जपून ठेवावेत असे होते..त्यातील एक म्हणजे मंजूषा अपराजित...वयाचा विचार करायला गेले तर आई मुलीचं नात लागेल आमच्यात पण मैत्री झाली आणि माझ्यासाठी ती मंजू झाली...

                 तिचे दांडगे वाचन हे तिच्यासोबत बोलतांना तिच्या शब्द संपत्ती वरूनच जाणवते.... मंजू च्या मुखातून निघणारा एक एक शब्द म्हणजे जणू समुद्रातील एक एक माणिक मोती टीपावा !! 

               वसा वाचनाचा या पावन कार्याची सुरुवात तिने  दर्जेदार केलीय. सुरुवातीला ती अनेक दिग्गजांचे नाव घेत होती ना तेव्हा माझा जीव वर खाली होत होता कारण ही मंडळी वाचून च मी लहानाची मोठी झालेय पण मनावरच गारूड काही उतरत नाही.आणि शेवटी तिने  व. पु.यांचं नाव घेतलं आणि माझे ओठ आपोआप रुंदावले. 

          मी हे पुस्तक वाचले नाही अद्याप...पण आता लालसा जागी झालीय..नवऱ्याचा बर्थ डे आहे पुढे....त्याला रिटर्न गिफ्ट म्हणून हेच पुस्तक मागणार .. ठरलंय माझं😉😉.700

               सुरुवात उत्कंठा वाढविणारी होती आणि म्हणून सलग  व्हिडिओ मी बारकाईने दोनदा पाहिला...काही वाक्य नोट करून ठेवलीत...

पुस्तकातील एक वाक्य मनात घर करून गेलं...

' मित्र पुरेपूर कळला की राग उरत नाही '.

आणि त्यावर मंजू च  वाक्य.."हे वाचून जो पुस्तक खाली ठेवेल तो करंटा".

'ओव्हरटाईम म्हणजे चैतन्याची पूजा '.

काय तो एकेक ओळीचा गाभा आणि त्यात मंजुचा मधुर आवाज...हो मधुरच....दुसरी उपमा नाहीच

     सुरुवात ते शेवट कधी झाला मला कळलेच नाही...

काहीतरी चांगलं सुरू करतोय याच समाधान मिळालं.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

निशा पांढरेची प्रतिक्रिया  :

उत्तम.. अतिउत्तम.. प्रत्येक वाक्याला प्रसंग आणि ते सादर करताना तुमचा निरागस, शांत चेहरा आठवला.. us आणि we मस्तच. त्याकाळी अशी बेभान जगणारी we होती आणि तिला समजून घेणारा us होता, याचं नवल वाटतं.. खरंच आहे, व. पु. ची माणसे श्रेष्ठ की त्यांची लेखनशैली श्रेष्ठ, विचार करायला लावणारी बाब आहे.. व. पु. आणि त्यांची माणसे आमच्यापर्यंत पोचवणाऱ्या तुम्हीही ग्रेटच..  मस्तच....👌🏻👌🏻👌🏻👌🏻

✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍

              चला चारोळी च्या दुनियेत 

🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆

एक रस्ता मी निवडलेला ...🔥
शब्दांच्या वाटेने जाणारा...🔥
शब्दसंतांची संगत घडविणारा...🔥
पुण्य नगरीत घेऊन जाणारा ..
..🔥

⬅️➡️⬅️➡️⬅️➡️

एक रस्ता मी निवडलेला..
शब्दांच्या गर्दीत हरवलेला ..
वेडी वाकडी वळणं नसलेला ..
स्वान्तः सुखाय ची अनुभुती देणारा ..

©️®️सौ. मंजूषा श्रीकांत अपराजित

⬅️➡️⬅️➡️⬅️➡️

एक मार्ग माझ्या आवडीचा ...💞
हात हाती घेऊन चालण्याचा..🤝
सुख दुःखाने भारलेला...😀😭
अंतिम श्वासापर्यंत साथ देणारा 

⬅️➡️⬅️➡️⬅️➡️

आयुष्याच्या चित्रपटात मी एक कलाकार आहे
भूमिका देणारा मात्र तो देव आहे.
कधी सुखाच्या, कधी दुःखाच्या सार्‍या भूमिका त्याच्याच आवडीच्या.
त्याच्याच दिग्दर्शनात मी नाचते आहे,स्वतःलाच नशिबवान मानते आहे.

©️®️मंजूषा श्रीकांत अपराजित

⬅️➡️⬅️➡️⬅️➡️

जरी विराला दव बिंदू तो ओल्या पातीवरूनी,
हळव्याश्या  त्या कुणा क्षणाला परते मोती बनूनी.
नको ग सखये होऊ कातर, विरहाचा तो क्षण ही 
मंगल ,
जाता जाता देऊन जाईन प्रेमाचा तो गंध सुगंधित
⬅️➡️⬅️➡️⬅️➡️

 तुझा सुप्रभात चा सांगावा ,
माझी सकाळ प्रसन्न करून गेला .
दिवसभर राहील सोबतीला आता ,
तोच तुझा हसरा , गोड  चेहरा .

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
©️®️ सौ. मंजूषा श्रीकांत अपराजित
⬅️➡️⬅️➡️⬅️➡️

आपल्या वेळेची किम्मत आपणच ठरवावी ,
तेवढ्याच वेळेत एखादी छान कृती करावी .
त्या  कृतीने जगाचे कल्याण व्हावे
तुमचे नाव त्रिखंडात दुमदुमावे
⬅️➡️⬅️➡️⬅️➡️

मन थोड अडलंय अडलंय ,
नाठाळ बनलय बनलय.
शब्द गेले संपून  संपून ,
चारोळी बसली रुसून रुसून 

⬅️➡️⬅️➡️⬅️➡️

©️®️ सौ. मंजूषा श्रीकांत अपराजित



वामांगी- अबला की सबला

वामांगी - वाम अंगाला  असणारी ती वामांगी.  वाम म्हणजे डावा.  त्यानुसार डाव्या भागाला असणारी ती वामांगी.

आता कुणाच्या डाव्या भागाला ? पुरुषा च्या म्हणजेच नवर्‍याच्या डाव्या भागाला अथवा हाताशी असणारी ती त्याची बायको .  अनेक शुभ प्रसंगी,  पूजा अर्चना करताना गुरुजी सुद्धा सांगतात - बायकोने  नवर्‍याच्या डाव्या हाताला बसा . का ? उत्तर नंतर शोधू या.

आता डावा भाग जो आहे तो नेहमी उजव्या भागापेक्षा थोडा कमकुवत मानतात.  कधी कधी वाईट सुद्धा मानतात .  उदा.  वाम मार्गी  म्हणजे वाईट चालीचा अथवा कमकुवत, असहाय्य , कमी शक्तीचा मानल्या जातो. ह्या हिशोबाने  वामांगी ही पुरुषा पेक्षा कमकुवत , असहाय्य , कमी शक्ति असणारी स्त्री झाली.  पुरुषप्रधान संस्कृतीने सरसकट ह्या विचाराला मान्यता दिली.  आणि स्त्री अबला, बलहीन,  क्षुद्र,  कमकुवत ठरली.

अगदी विरुद्ध अथवा विरोधाभासी विचार पहा....

१. A road sign -  For safety  follow लेफ्ट side. लेफ्ट side is attributed to शक्ति.

२. वामे  शक्ति धरम्  - म्हणजे डाव्या हाताला शक्ति धारण करणारा असा तो शिव .  सर्व  विश्वाचा संहार कर्ता  - ओळखल्या जातो आहे पार्वती मुळे - डाव्या भागाला असणार्‍या शक्ति मुळे . सांगा स्त्री अबला की सबला ?

३. वामे  तु जनकात्मजा - म्हणजे कोण ? मर्यादा पुरुषोत्तम  श्रीराम प्रभू. ओळख कशी ह्यांची. डाव्या बाजूला असलेल्या सीते मुळे . श्रीराम प्रभू ची ही शक्ति आहे. तरीही स्त्री अबला ?


जिजाऊ मातेने संकटाशी सामना करत प्रसंगी तलवार चालवून शिवबाच्या मनी स्वराज्याचे बीज पेरले. ती माता अबला कशी? "श्री, सखी , राज्ञी जयती " असा शिक्का कट्यारीचा मान मिळवणारी येसु बाई राणी सगळ्यानाच ठाऊक आहे.

पुराणातील दाखले , इतिहासातील उदाहरणे आपल्याला सशक्त नारीचेच  दर्शन घडवितात. स्वातंत्र्य पूर्व  काळातील दाखला द्यायचा ठरविले तर सावरकरांच्या "त्या तिघी " कमी का होत्या ?  गरोदर पणाचे  नाटक करत जिवंत बॉम्ब पोटाला बांधुन क्रांतिकारकां पर्यंत पोहोचवण्याचे पुण्यकर्म करणार्‍या अबला नाहीत.

काय ह्या स्त्रीया फक्त आजच्या एका दिवसाच्या मानाच्या भुकेल्या होत्या? निश्चितच नाही.

स्त्री आणि पुरुष एकमेकांना  पूरक आहेत. "धर्मे च  अर्थे च कामे च मोक्षे च  नातिचरामी" असे वचन देणारा पुरुष हे वचन फार लवकर विसरतो . तरी ही शक्तिरूपीणी सगळाच लढा एकटीने देत असते.

जेंव्हा पूजा सांगणारे गुरुजी मंत्रोच्चार करताना स्त्री ला "हाताला हात " लावा असे सांगतात त्यावेळी हे सर्व कार्य निर्विघ्नपणे पार पडावे ह्या साठी त्या स्त्रीच्या शक्तीचा आधार मागितल्या जातो.

समाज पुरुषा जागा हो. एक दिवस स्त्री चा  उदो उदो करून उरलेल्या सगळ्या दिवशी तिची पिळवणूक करण्याचा अधिकार निश्चितच तुला नाही. तिची अवहेलना करू नका.
मनू स्मृतीत अगदी स्पष्टपणे नमूद केले आहे -


यत्र नार्यस्तु पूज्यन्ते, रमन्ते तत्र देवताः|
यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफलाः क्रियाः||


म्हणजेच ज्या ठिकाणी स्त्रीची पूजा होते त्या ठिकाणी देवतांचा निवास असतो . ज्या ठिकाणी स्त्रीचा सन्मान होत नाही त्या ठिकाणी केल्या गेलेली सर्व चांगली कर्मे निष्फळ होतात.

रावणाचे उदाहरण आपल्याला ठाऊकच आहे.  अत्यंत मुत्सद्दी राजकारणी , महापराक्रमी , ज्ञानी, कट्टर शिवभक्त असून सुद्धा स्त्रीचा अपमान करण्याचे घोर पातक त्याच्या हातून घडले होते. त्यामुळे त्याच्या उत्तम गुणांचा र्‍हास झाला. आपल्या सर्व पुत्रांना गमावावे लागले. अंततोगत्वा त्याचा ही विनाशच झाला.

म्हणून एकच  सांगणे स्त्रीचे केवळ एक दिवस पूजन करून भागणार नाही. सदैव तिचे ऋणी रहा. माता , भगिनी,  पुत्री, भार्या, स्नुषा ह्या सगळ्या रूपाचा आदर करा.

©️®️ सौ. मंजूषा श्रीकांत अपराजित


Friday, 18 February 2022

मेरा भारत महान- तरुणाईला नव्याने जाणीव करून देण्याची गरज

मूळ विषयाला हात घालण्या पूर्वी ज्यानी जीवन दिले, जीवन घडविले त्या मातापित्यांना सादर समर्पित ...🙏🙏🙏🙏🙏

💟💟💟💟💟💟💟💟💟💟💟💟💟💟💟💟

बहु यत्न केले 
वर्णावया  तुम्हाला,
विनवले बहु मी 
माते सरस्वतीला ,
परी शब्द स्तब्ध झाले, 
अन् अर्थ क्लान्त झाला 
वर्णू कशी तुम्हाला 
हे माय तात सदया ...
तुम्हीच शब्द  अमुचे 
तुम्हीच अर्थ आम्हा 
असता तुम्ही गृही हो 
नसते त्रुटी कशाला 
हे माय तात सदया ...
देशी अम्हा जरी तू,
शतजन्म रामराया
दे माय तात हे ची
मागू दूजे  कशाला 
वर्णू कशी तुम्हाला 
हे माय तात सदया ...
💟💟💟💟💟💟💟💟💟💟💟💟💟💟💟💟

माझ्या तरुण विद्यार्थी मित्रानो नमस्कार ,

तुमच्या कडे पाहून मी अभिमानाने फुगून जाते.  तुमच्या सळसळत्या उत्साहाला , कार्यनिपुणतेला खरोखरीच सलाम. तुमच्या बरोबर वावरताना कुणालाही आपल्या वयाच्या विसर पडावा. विविध विषयातील  तुमचे नैपुण्य वाखाणण्या जोगेच आहे.  नवे पंख लावून आभाळात भरारी घेताना मला तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगाविशी वाटते..

"नका विसरू देशाते .."

नेहमी प्रमाणे तुम्ही विचारणारच .. कां ? ऐका ..
तुमच्यातील कित्येकांनी मोठी मोठी स्वप्ने पाहिली आहे. कुणी डॉक्टर, कुणी इंजीनिअर, कुणी आय ए एस होणार.  कुणी उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशात जाणार. तिथल्या सुखसोईंना भाळणार आणि आपल्या माणसांना विसरून तिथेच स्थायिक होणार.

अर्थातच तुम्ही सुखसोयीं चा त्याग करा असे मी म्हणणारच नाही . पण जरा विचार करा ...

ज्या भूमीत तुम्ही जन्म घेतला , जिच्या अंगाखांद्यावर खेळलात, मोठे झालात, तिचे ऋण फेडणे हे तुमचे आद्य कर्तव्य नाही काय? तुम्ही म्हणाल काय ठेवले आहे ह्या भूमीत? चला तर मी आज तुम्हाला ह्या भूमीची नव्याने ओळख करून देते...
चला तर पाहू या माझ्या महान भारतभूला. प्रथम तिला वंदन करू या 

"नमो मातृभूमि जिथे जन्मलो मी ।
नमो आर्यभूमि जिथे वाढलो मी ।।
नमो धर्मभूमि जियेच्याच कामी ।
पड़ो देह माझा सदा ती नमीन मी ।।

भारत माझा देश आहे आणि तो खरोखरीच खूप महान आहे.  ह्या देशाला खूप मोठी भौगोलिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे.

प्रथम आपण तिचा भौगोलिक विचार करू या....

भौगोलिक दृष्ट्या विचार करता आपल्या लक्षात येईल की हा एक अतिविशाल देश आहे.  क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात सातव्या स्थानावर आहे

भारताची सीमा शेजारील सात देशांना स्पर्श करते.

गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रा, गोदावरी, नर्मदा ह्या सारख्या अनेक पवित्र नद्या ह्या भूमीचे सिंचन करतात. म्हणूनच ती सुजलाम सुफलाम आहे. 

एव्हडेच नव्हे तर अरबी समुद्र , बंगालचा उपसागर माझ्या मातृ भूमीचे पद क्षालन करताना अजिबात थकत नाही.
उंच व विशाल हिमालय पर्वत एखाद्या जबाबदार पाठीराख्या भावा प्रमाणे सीमेवर उभा राहून ह्या माझ्या मातृ भूमीचे रक्षण करतो आहे

आपल्या ह्या मोठ्या भावाच्या कर्तृत्वावर आश्वासित होऊन विंध्य पर्वतराजी सह सह्याद्री, सातपुड्यानेही आपले हात पाय ऐसपैस पसरविले आहे. केवळ उंची वा रुंदीचा मोठेपणा ही पर्वत राजी मिरवीत नाहीत. ह्यानी आपल्या अंगाखांद्यावर अनेक वृक्षांना थारा दिला आहे. नाना प्रकारच्या औषधोपयोगी वृक्षांची वने ह्या ठिकाणी आहेत . हा वारसा इतर कुठल्या देशाला मिळाला असण्याची शक्यता फार कमी आहे. वने-उपवने, जंगले वैविध्यपूर्णतेने नटले आहेत. गहन, अति गहन होता होता ह्या वनानी आपल्या अंतरंगात तितक्याच विविध प्राण्यांना आणि पक्षांना सामावून घेतले आहे. हे वृक्ष , हे प्राणी , हे पक्षी एकत्रितपणे आमच्या देशाच्या वातावरणाचा समतोल सांभाळून आहेत. विविधतेतील एकतेचे हे ज्वलंत उदाहरणच म्हणावे लागेल.

सोन्याचा धूर निघणार्‍या ह्या देशाचा  आता सगळीकडे बोलबाला होऊ लागला होता. म्हणुनच की काय इतर खंडातील अनेक देशांची वक्र दृष्टी आपल्या देशाकडे वळली. भारत भूमी संकटात सापडली. 

इंग्रज, पोर्तुगीज,  फ्रेंच, डच हे  भारतात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी धडपडू लागले . आपापसात ही लढू लागले होते.

त्यापूर्वीही मुगल राजांनी भारत भूमीला आणि भारतवासीयांना  व्यथित केले होते. परंतु छत्रपति शिवाजी महाराजांच्या कालखंडात मुस्लिम कारवायांना लगाम लागून मराठा साम्राज्याचा विस्तार झाला. 

त्यानंतर पेशवाई आली ती आसेतू हिमालया पर्यंत राज्य करण्याचे स्वप्नं घेऊनच. परंतु  बंड, भाऊबंदकी, फितुरी अशा अनेक घटनांना सामोरे जात पेशवाईचा अंत झाला.  ह्याचाच फायदा घेऊन आधीपासूनच व्यापाराचे कारण घेऊन भारतात शिरलेल्या इंग्रजांनी भारताला गुलामगिरीच्या खाईत लोटले. भारत माता व्यथित झाली.  गुलामगिरीच्या शृंखलेत जखडल्या  गेली . इंग्रजांचा लाल  बावटा दिमाखाने फडकू लागला.

एव्हढ्यात कंटाळला काय? असे कसे चालेल? चला थोडे वेगळे बोलू या. चला चला आपल्या भारत मातेची ऐतिहासिक पार्श्वभूमी जाणण्याचा प्रयत्न करू या .

पुराण तत्त्ववेत्या कडून मिळालेल्या माहिती नुसार आदि मानवाने ७०,००० वर्षा पूर्वी भारतात प्रवेश केला.  कळतोय का अर्थ?  म्हणजेच भारत भूमीला ७०,००० वर्षाचा इतिहास आहे .

साधारण पणे ९००० वर्षा पूर्वी भारतातील  मानव ग्रामीण व शहरी वस्त्या करून राहू लागला होता.

त्यानंतर सिंधू संस्कृती चा उदय झाला.  काही कालखंडा नंतर सिंधू संस्कृती लयास गेली. 

हळूहळू वैदिक संस्कृती जोर धरू लागली होती. पण भारत भूमीला आक्रमणाला सामोरे जावे लागत होते . त्यात इथली संस्कृतीही होरपळली जात होती.

अलेक्झांडरचे आक्रमण, मौर्य साम्राज्य, सम्राट अशोकाच्या राज्य विस्ताराची लालसा , त्यावेळी झालेला नरसंहार आणि त्या  नंतर पश्चाताप दग्ध सम्राट अशोकाला ह्याच भूमी ने पाहिले . अशोकाच्याच कालखंडात  बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार वेगाने झाला. अशी अनेक स्थित्यंतरे ह्या भारत भूने अनुभवली.  अनेक कटू प्रसंग पचवीले.

हळूहळू बौद्ध धर्माचा पगडा कमी होत गेला. वैदिक धर्माची पुनर्बांधणी झाली. साहित्य , गणित, शास्त्र, तत्त्वज्ञान इत्यादी क्षेत्रात भारताने मोठी मजल मारली. व्यापारी दृष्ट्या ही भारत तेंव्हा अतिशय पुढारलेला देश होता. स्थापत्य क्षेत्रातील प्रगतीही स्तुत्य होती. त्या काळातील कित्येक बांध कामाचे विश्लेषण आजही तांत्रिक दृष्ट्या पुढारलेल्या  देश विदेशातील स्थापत्य शास्त्रज्ञांना करता येत नाही. 
हा काळ भारताच्या ऐतिहासिक काल खंडातील सुवर्ण काळ होता

म्हणूनच आपण अजूनही म्हणतो, " यहाँ डाल डाल पर  सोने की चिडीयाँ करती थी बसेरा... "

इतकी स्थित्यंतरे पाहणारा हा एकमेवच देश असावा.

तरीही मित्रांनो  ही भूमी रक्तबंबाळ होत असतानाही ताठ उभी होती. कारण तिचा तिच्या सुपुत्रांवर  आणि  सुकन्यांवर ठाम विश्‍वास होता. 

माझ्या प्रिय तरूण तरुणींनो अगदी अशाच विश्वासाची आजही गरज आहे . असो. 

"बंदीत माय भू ही आम्ही खुले कशाला?"

असे म्हणत म्हणत तिचे वीर पुत्र एक एक करत स्वातंत्र्य यज्ञाच्या बलि वेदीवर हसत हसत चढत होते.  लहान , मोठे, बाल ,वृद्ध स्त्रिया कोणीही मागे सरायला तयार नव्हते.  कोणी घरात राहून  कोणी समरांगणात जाऊन रक्ताची आहुती देत होते. राणी लक्ष्मी बाई , तात्या टोपे, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, राजगुरू, वासुदेव बळवंत फडके,  चाफेकर बंधू, चंद्रशेखर आझाद,  स्वातंत्र्य वीर सावरकर  किती किती जणांची नावे सांगू?  

विद्यार्थी मित्रानो ह्या सर्वानीच आपल्या रक्ताची शिंपण करून भारत मातेला स्वतंत्र केले. 

टिळक -गोखले- आगरकर- रानडे ह्यानी  सतत समाज जागृतीचा यज्ञकुंड पेटवता ठेऊन  देश भक्तीच्या प्रखर  भावना युवकांमध्ये जागत्या ठेवल्या. ह्या अशा नमूद केलेल्या आणि अनेक अनाम वीरांच्या  बलिदाना पुढे  इंग्रज सत्तेला हार मानावी लागली. भारतातून इंग्रजांची उचल बांगडी झाली.

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. *कृतकृत्य झालेला तिरंगा अभिमानाने फडकू लागला .

विद्यार्थी मित्रांनो अशा नर रत्नांची खाण असलेली ही भारत माता महानच आहे. 

अनेक वर्षांपासून किंवा शतकापासून आपल्या परंपरा , रिवाज सांभाळून ठेवुन पुढच्या पिढीकडे हा वारसा सहजतेने दिल्या जातो. त्यांचा सांभाळ करा . स्वातंत्र्य संग्रामातील आपल्याच बांधवांचे चरित्रात आठवा. त्यांचे गुण आत्मसात करा. आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेल्या संस्कृतीचा ठेवा जतन करा . सत्यम शिवम सुंदरमचा  आग्रह धरा . वाईटाची कास धरू नका . 

भारत देशाचे  विश्वगुरू होण्याचे स्वप्न पूर्णत्वास न्या  आणि मोठ्या अभिमानाने गर्जना करा "मेरा भारतमहान"

🟥🟧🟨जयहिंद🟥🟧🟨


©️®️ सौ मंजूषा श्रीकांत अपराजित

Monday, 31 January 2022

ताई तुझी आठवण येते....

 ताई ,दोनच दिवसा पूर्वीची गोष्ट आहे. स्वतः च्या मनाशी एकट्यात कबूल करायचा प्रयत्न केला की आता तू नाहीस आमच्यात. तसही मनाला झालेली जखम अजून ओली आहे हे तेंव्हा ही जाणवले. पण तरीही कसेतरी दामटून मनाला गप्प बसवले.

....आणि आज सकाळी सकाळी घरी येताना रस्त्याने निर्वाण रथ दिसला. तसे त्यात नवीन काहीच नव्हते. असे दृश्य तर नेहमीचेच . पण माझ्या मनाने अगदी नकळत त्यातल्या फरकाची नोंद केली .
.... त्या वाहनात असलेला देह  निळ्या प्लास्टिक मध्ये गुंडाळला होता .  आजूबाजूला  कोणीही आप्त नाही. फक्त एक ppe किट घातलेला व्यक्ती अंतर साधून बसलेला . देहावर एकही हार किंवा फुल नाही. लक्षात आलं करोनाचा बळी.
.... आणि लक्षात आले आपली ताई ही अशीच अगदी एकटी गेली.ती भयानक रात्र जशीच्या तशी डोळ्यासमोर उभी राहिली . तेंव्हा झालेली जखम भरत आलीय असे वाटत असतानाच जखमेवरची खपली खसकन निघाली आणि भळभळत वाहू लागली. खूप मोठ्याने ओरडून रडावसं वाटतय ग पण आवाजच नाही निघत. खूप घुसमट होतेय ताई. कुणाशीच दुःख वाटून घेता येत नाही. कुणाशी वाटू हे दुःख ? ९० वर्षाच्या आईशी,  आपल्या पेक्षा खूप लहान असणार्‍या बहिणीशी? भाच्या लोकांशी? तू गेल्यानंतरही साध सांत्वनासाठी ही जीजू आणि तुझ्या पोरीं पर्यंत पोहोचू नाही शकले  हे शल्य तर कायमच असणार आहे.
...लहानपणापासून कधीच भांडलो नाही म्हणून मोठ्या अभिमानाने मिरवली ग मी माझ्या सासरी. माझ्या लग्नानंतर ही सदोदित माझ्या अडचणीत तुम्ही दोघेही खंबीर पणे उभे राहिलात. त्याची परतफेड कशी करू? छोट्या छोट्या गोष्टी सतत एकमेकाना सांगत राहिलो, एकमेकांचे सल्ले घेत राहिलो अन ह्या अशा प्रसंगी शब्दाचीही देवाण घेवाण नाही?  कारण असो नसो , एकत्र असलो की सतत हसत होतो, लोकांच्या असूयेचे कारण बनत होतो. ताई ते दिवस पुन्हा कधी येणार नाही हे स्वतः ला समजावून सांगताना खूप घायाळ होते ग मी.  बर दिवस ही कोणता निवडला जाण्यासाठी ? हरतालिका ? अग दुसर्‍या दिवशी गणपती येण्याची गडबड नसणार का ? म्हणजे तुझ्या पुढच्या विधी साठी सुद्धा येऊ नाही ना शकणार मी . कधी शब्दानेही न दुखावणाऱ्या ताईने दिलेली ही कठोर शिक्षा आयुष्यभर कशी भोगू?

सौ.मंजूषा श्रीकांत अपराजित

Friday, 21 January 2022

कवितेच्या दुनियेत


|| श्री गणेशाय नमः||

१.

निश्चय                                            

जग मला हरवायला निघालयं,
ऐकून मी हादरलेच होते.
कारण माझ्या जगात सारे
आप्त माझे भरले होते.👨‍🎤👩‍🎤🧑‍🚀🕵‍♀️👮

लहानपणी पाठ केलेली
भगवत् गीता मला आठवली
"सीदन्ती मम गात्राणिʼʼ चा
अनुभव मला देऊन गेली .

त्या क्षणी आठवला त्या 
युग पुरुषाचा संदेश
कृतनिश्चय म्हणत म्हणत
भरला मी माझ्यात आवेश 

ह्या क्षणी दोस्तहो 
मी फार खुशीत आहे
ह्या जगाशी ,नव्हे ह्या आप्तांशी
लढण्यासाठी दंड मी थोपटले आहे.

ह्या युद्धात जिंकले तर 
राणी तुमची बनून येईन
दुर्दैवाने संपले तर
आठवणी माझ्या देऊन जाईन.

©️®️सौ मंजूषा श्रीकांत अपराजित 

----
.

पुन्हा एकदा ती वेळ यावी🕧🕐🕜

पुन्हा एकदा ती वेळ यावी ,
मोठेपणाची गुर्मी सरावी.
बालपणीच्या त्या काळात जावे,
सख्यांसवे मग तेथे रमावे.🤼‍♂️🚴🤸🤾

झुला झुलावे , लपुनी बसावे,
त्या मातेच्या कुशी शिरावे.
बाबांसवे फिर फिरूनी यावे,
हवे तसे मग हुंदडावे .

देशील देवा  पुन्हा एक संधी,
शाळे मध्ये त्या पुन्हा जावयाची.🏢🧱
रांगे मध्ये त्या उभी राहण्याची.
मित्रां सवे त्या पुन्हा खेळण्याची .

-----

©️®️सौ मंजूषा श्रीकांत अपराजित 

३.

कृष्ण शोध 

नि:स्तब्ध मी, नि:शब्द  मी
शब्दातल्या "अर्थात"  मी .
दृश्यातला अदृश्य मी  ,🌈
पिंडातला ब्रह्मांड मी.

रेणूहूनी अति सूक्ष्म मी,
मोठा तरी विश्वाहूनी.
वृक्षात मी ,  बीजात मी ,
हृदयी तुझ्या वस्तीस मी.

गात्रात मी , स्पर्शात मी
प्राणात मी , जीवात मी.
श्वासात मी, उश्वास मी,
शोधी मला पवनातही .

स्वरात मी,  लयीत मी,
गीतात  मी, तानेत मी.
सप्त स्वरांचा साज लेवुनी
शोधी मला मुरलीत ही.

राधेत मी , मीरेत मी ,
गोप गोपीच्या स्नेहात मी .
द्वेषात मी , प्रेमात मी ,
भक्त मनातील कृष्ण मी.

-----

©️®️सौ मंजूषा श्रीकांत अपराजित 

४.

कैफ त्या माझ्या स्वरांचा 

गंधाळलेल्या  त्या स्वरांनों, या तुम्ही परतून या ,
रात्र आहे संपलेली, स्वागता तुम्ही सिद्ध व्हा.
शब्द माझा मी दिलेला ,ठेवूनी साक्षी शशिला
कालच्या त्या सार्‍या व्यथांना, तुम्ही पुन्हा प्रसवू नका .

तळपेन मी फिरूनी पुन्हा , सूर्या सवे नभ अंतरी
बरसेन मी धरती वरी , चपलेस ही हरवेन मी
तुम्ही परी गाऊ नका , कालची ती भैरवी ,
गंधाळलेल्या  त्या स्वरांनों, या तुम्ही परतून या

ठिणगी ही मी , स्फुलिंग मी ,ज्वाला कधीही होईन मी .
जाळेन ह्या सार्‍या जगाला , विसरू कधी ना देईन मी ,
तुम्ही परी या साथ द्याया , जगण्यास या आतुरले मी
गंधाळलेल्या  त्या स्वरांनों, या तुम्ही परतून या


©️®️सौ मंजूषा श्रीकांत अपराजित 

------
५.
अखेरचे वळण

आठवणी माझ्या सरणार नाही,
🌲तुला मी विसरणार नाही,
वाटेवरच्या त्या वळणावर,
जरी मी तुला दिसणार नाही.🌲

🌲असा तू बावरू नकोस,
पाऊल मागे घेऊ नकोस,
वाटेवरचे ते वळण, 🌲
पार करायला विसरू नकोस.

वळणाच्या त्या पलीकडे,
🌲ताटव्याने मोगरा फुलला असेल,
प्रत्येक फुलाच्या गंधा मागे ,
सावली माझी तुला दिसेल.🌲

🌲गंध भरल्या सावलीनीशी,
तुला सोबत करत राहीन,
तुला विजयी झालेला,🌲
दुरूनच मी पहात राहीन.

©️®️सौ मंजूषा श्रीकांत अपराजित 
-----
.
विसरलास तू सारे

विसरलास तू सारे
कळले जेंव्हा मजला ,
लाटांच्या त्या हिंदोळ्यानी
दूर किनारा केला .

काठावरचे सूर तुझे ते
मजला खुणवित होते ,
नयना मधले आसू सारे
मागे खेचित होते.

कणा कणा ने बुडता बुडता
तुजला निरखीत होते,
तिमीरात ही अंध दिशांना
तुलाच शोधत होते.

का रुसलासी
नव्हते मजला कळले,
विना गुन्ह्याचे नको
मला रे पहारे वेदनांचे.

©️®️सौ मंजूषा श्रीकांत अपराजित 

-----

७.

शिदोरी

नवीन प्रवासाची सुरवात केली,
आईने अनुभवाची शिदोरी गाठी बांधली.
निरोप दिला मायेने,
चाल म्हणाली सरळ वाटेने.
मीही हसून मान डोलावली,
पाणावलेल्या डोळ्यांनी पाठ फिरवली.
तेंव्हापासून सरळ वाट शोधतेच आहे,
नागमोडी वळण चुकवतेच आहे.
वाटेतले काटे मनातच पुरते,
तिला ख्यालीखुशालीचे पत्र पाठवते.
थकलेल्या डोळ्यातली चमक दुरूनच पाहाते,
आयुष्याचे सार्थक झाले , मनालाच सांगते.

©️®️ सौ मंजूषा श्रीकांत अपराजित 
----
८.
जीवन

🌈⛅⛈🌗🎆

मी,माझे,माझ्यासाठी
तुझे, आपले आपल्यासाठी,
खूप सारे जगून झाले,
परतीच्या ह्या वाटेवरती
एकटेपण मला छळून गेले.

सुखाच्या सरींनी मी
मोर बनून नाचले,
दुःखाच्या क्षणी मी
तळमळून रडले,
परतीच्या ह्या वाटेवरती
मलाच मी हरवले.

हा माझा, तो परका,
मी मोठा , तू छोटा .
हा उजवा, तो डावा,
खेळ होता मनाचा सारा.
परतीच्या ह्या वाटेवरती
गोंधळ सारा तसाच राहिला.

भूतकाळातील घटनांसाठी,
भविष्यातील स्वप्नांसाठी,
वर्तमानाशी जुळवते आहे.
मागची वाट खुंटलेली,
पुढली सारी अंधारलेली,
परतीच्या ह्या वाटेवरती, 
तिथेच मी थबकलेली,
तिथेच मी थबकलेली...

©️®️सौ मंजूषा श्रीकांत अपराजित 

-----

.

सखये तुझ्याविना अधुरा मी..

सांग सखये काय गुन्हा केला ,
सर्व संगे संसार त्याग केला
दिली होती आण मीच मज गे
जपीन तुजला प्राण प्रतिष्ठेने

काय सांगू त्या वृद्ध माय ताता  ,
काय कथु त्या भगिनीं आणि भावा
कशी निर्लेप अशी तू झाली
दोघी तनया विकल अति होती.

करोना तो काळ बनूनी आला 
स्वये संगे तुज  घेऊनी पळाला
बहुत विनये  प्रार्थिले तयाला
तरी दुष्टा ने घात मला केला.

कसा राहू ह्या थोर महाली गे
तुझ्या विना हे भगभगीत सारे.
वृथा वाटे पदवी वैद्यकीची
नसे आता लालसा धनाची.

सांज समयी एकलाच मी गे
आठवानी तुज सी आळवी गे.
पुनः जन्मा येशील कधी तू गे?
पुन्हा मजला भेटशील का गे ?


©️®️सौ मंजूषा श्रीकांत अपराजित 

-----

१०

अनोळखी पाऊलवाट 

ओळखीची पाऊलवाट अनोळखी झाली
आणि सरळ वाटेला नागमोडी वळण दिसू लागली
एक एक पाऊल जड झाले
अन विसाव्याचे ठिकाण दूर जाऊ लागले
जीवाचा जिवलग परका झाला
मना चा किनारा तटकन तुटला
तीच वाट ओळखीची
पुन्हा एकदा अनोळखी झाली 

©️®️सौ मंजूषा श्रीकांत अपराजित 
-----
११.
मैफिल

मीच माझ्या मैफिलीचा बेसूरा सूर  जाहलो ,
चांदणे शापित ज्याचे त्या घराचा चंद्र झालो .

शब्द सारे ,अर्थ सारे , खिन्नता लेऊन आले
पौर्णिमेच्या चांदराती , मन असे काजाळले,
मीच माझ्या मैफिलीचा बेसूरा सूर  जाहलो..

चांदणे शापित ज्याचे त्या घराचा चंद्र झालो .


तार ही छेडियली , सूरही झंकारले,
का ? कसे  ? ते गीत माझे साज नाही ल्यायले,
मीच माझ्या मैफिलीचा बेसूरा सूर  जाहलो...

चांदणे शापित ज्याचे त्या घराचा चंद्र झालो .


आरतीला दीप होता,भावनांचा गंध होता ,
गीत माझ्या आवडीचे, ईश्वराने त्यागीले,
मीच माझ्या मैफिलीचा बेसूरा सूर  जाहलो
चांदणे शापित ज्याचे त्या घराचा चंद्र झालो .


©️®️सौ मंजूषा श्रीकांत अपराजित 

-----

१२.

Mother's Call

I am there for her till my death.
I know she is strong enough,
physically as well as mentally.
She is brave, but will be lonly fighter,  after my death.
Will you be there for her as a big support?

I promise you, she won't interfere in your family life,
I promise you, she won't depend on you for money ,
But sometimes she will be needing someone To talk to,
Will you be there for her as a good friend?

Sometimes in future she may get confused,
Or may not be able to find the correct way out,
Will you be there for her as a best guide ?

A mother is very panic for her,
When she thought about her future,
A mother gave her everything possible,
But was not able to give her a brother,
Will you be there for her as a big brother, after my death?


©️®️सौ मंजूषा श्रीकांत अपराजित 

-----

१३.

प्रिय भगिनीस

गे सखे भगिनी प्रिये गे
शब्द माझे पाठवू कां ? 
धुंद मधुर त्या तुझीया स्वरांचा
साज तू देशील का ?
गे सखे भगिनी प्रिये गे.....

ताल तो तव दास गे
सूरही  तुज अंकित गे
पोरक्या शब्दा सवे तू
सांग गे सजशिल का ?
गे सखे भगिनी प्रिये गे.....

माय तू त्या पोरक्यांची 
ते तुझे पुत्र गे
देऊनी ममता तुझी गे
सांग त्यांची होशील का ?
गे सखे भगिनी प्रिये गे....

लेवूनी माया स्वरांची 
दिगदिगांतरी फिरतील ते
जय पताका  गे तयांची 
सांग तू होशील का?
गे सखे भगिनी प्रिये गे......

©️®️सौ मंजूषा श्रीकांत अपराजित 


💕💟💕💟💕💟💕💟💕💟💕💟💕💟💕💟



Welcome

संस्कारित नारायणी : सौ. ललिताशास्त्री विनायकशास्त्री आर्वीकर

 ती माणसच निराळी असतात , पूर असतो त्यांच्या स्वभावात,  किनारा सोडतात तेंव्हा नदीहून बेफाम होतात , कोसळतात खोल तेंव्हा किती उंच जातात . हृदय ...